मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 06:03 IST2026-04-12T06:02:20+5:302026-04-12T06:03:04+5:30
Devendra Fadnavis: साहित्य मानवी व्यक्तिमत्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. मनाची तरलता साहित्य जिवंत ठेवते. त्यामुळे चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलीचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मनाची तरलता जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने साहित्य निर्मिती आवश्यक : देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली - साहित्य मानवी व्यक्तिमत्वाला यंत्रमानव होऊ देत नाही. मनाची तरलता साहित्य जिवंत ठेवते. त्यामुळे चक्रधर स्वामी, ज्ञानेश्वर माऊलीचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये महिलांनी साहित्य निर्मिती अखंड सुरू ठेवावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पहिल्या दोन दिवसीय 'महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचे' आयोजन करण्यात आले आहे. 'सरहद, पुणे' आणि महाराष्ट्र शासनाच्या 'मराठी भाषा विभागा'द्वारे आयोजित या संमेलनाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी झाले. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून संमेलनाच्या मुख्य स्थळाला 'महाराणी ताराराणी दालन' असे नाव देण्यात आले होते.
मराठीसाठी महत्त्वाच्या घोषणा
याप्रसंगी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली. "मराठी भाषा इंटरनेटवर अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व पोर्टल्स अपडेट केली जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीसाठी ७५ मंच तयार केले जातील. विशेष म्हणजे, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्याला स्वतंत्र पुरस्कार देण्यासाठी मराठी भाषा
विभाग पुढाकार घेईल," असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनातही साहित्याचा ओलावा आवश्यक : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "शासकीय फाईलींवरील 'निर्णयार्थ सादर' या शेऱ्यापेक्षा कविता आणि कादंबऱ्यांमधून प्रगत होणारी भाषा अधिक तरल आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात यंत्रमानव होण्यापासून साहित्यच मानवाला वाचवू शकते." महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन केले. संमेलनाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने झाली. यात ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि इतर साहित्याचे विधिवत पूजन संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांच्याहस्ते करण्यात आले.
संकटाच्या काळात साहित्यच देते आधार : रश्मी शुक्ला
महाराष्ट्राच्या माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनीही आपल्या मुलाखतीत प्रशासकीय प्रवासातील रंजक पैलू उलगडले. पोलिस दलातील आव्हानात्मक जबाबदाऱ्या पार पाडताना साहित्याने मला नेहमीच आधार दिला, असे त्या म्हणाल्या. बिहारमधील शालेय शिक्षणापासून ते महाराष्ट्रातील सर्वोच्च पोलिस पदापर्यंतचा प्रवास मांडताना त्यांनी शिक्षणातील कष्टांचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशासकीय जबाबदारीला संवेदनशील लेखणीची जोड : लीना मेहंदळे
संमेलनाच्या मुख्य सत्रात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखिका लीना मेहंदळे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, प्रशासकीय खुर्चीवर बसून केवळ फायली निकाली काढणे म्हणजे कर्तव्य नव्हे, तर त्या पदाचा वापर समाजातील अनिष्ट प्रथा मुळापासून हटविण्यासाठी करणे हीच खरी लोकसेवा आहे. मेहंदळे यांनी सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्मूलनासाठी दिलेल्या धाडसी लढ्याचा अनुभव सांगितला.