CoronaVirus News: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; राहुल गांधींनी मोठा निर्णय घेतला; इतर नेते अनुकरण करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 13:15 IST2021-04-18T13:14:32+5:302021-04-18T13:15:37+5:30
congress leader Rahul Gandhi suspends all his election rallies in West Bengal amid surge in corona cases: इतर पक्षीय नेत्यांना राहुल गांधींनी केलं विशेष आवाहन

CoronaVirus News: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला; राहुल गांधींनी मोठा निर्णय घेतला; इतर नेते अनुकरण करणार?
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एकाच दिवशी १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आज हा आकडा तब्बल २ लाख ६० हजारांच्या पुढे गेला. महाराष्ट्र, दिल्लीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. मात्र आता कोरोना इतर राज्यांमध्येही वेगानं हातपाय पसरत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केंद्रानं केली असून दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.
हादरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण, 1,501 जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये गेल्या महिनाभरापासून प्रचारसभा सुरू आहेत. या सभांना हजारोंची गर्दी होत आहे. यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 'कोरोनाचं संकट पाहता पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय मी घेतला आहे. सद्यस्थितीत अशा सभांमुळे जनता आणि देशाला किती धोका आहे याचा विचार राजकीय पक्षांनी करायला हवा,' असं आवाहन राहुल यांनी ट्विटद्वारे केलं आहे. (congress leader Rahul Gandhi suspends all his election rallies in West Bengal amid surge in corona cases)
कोविड संकट को देखते हुए, मैंने पश्चिम बंगाल की अपनी सभी रैलियाँ रद्द करने का निर्णय लिया है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 18, 2021
राजनैतिक दलों को सोचना चाहिए कि ऐसे समय में इन रैलियों से जनता व देश को कितना ख़तरा है।
"कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’
देशात लवकरच लॉकडाऊन?
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते. देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली. त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. राज्यात एकूण आठ टप्प्यात मतदान होत आहे. यापैकी पाच टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. तर तीन टप्पे शिल्लक आहेत. या तीन टप्प्यात असणारे मतदारसंघ वगळता उर्वरित पश्चिम बंगालचा समावेश देशव्यापी लॉकडाऊनमध्ये असेल, असं सूत्रांकडून समजतं. आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झालं आहे. या सर्व राज्यांचे निकाल २ मे रोजी हाती येतील. मात्र तोपर्यंत थांबल्यास देशातील परिस्थिती आणखी भीषण होईल. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील काही भाग सोडल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबद्दल एकमत झाल्याचं समजतं.