'... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 13:04 IST2021-07-02T13:03:29+5:302021-07-02T13:04:48+5:30

Rahul Gandhi : राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

congress leader rahul gandhi attacks on centre over vaccination drive | '... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले

'... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले

नवी दिल्ली : कोरोना लसीवरून (Corona Vaccine) राजकीय वातावरण तापले  आहे. कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'जुलै आला, लस आली नाही', असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकास लवकरात लवकर कोरोना लस देण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या कोरोना संकटापासून लोकांना वाचविता येईल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे. राहुल गांधींच्या या ट्विटनंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राहुल गांधी यांना लसीवर क्षुद्र राजकारण करू नये असे आवाहन केले आहे.

राहुल गांधींच्या या लसीवरील ट्विटला उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "मी कालच जुलै महिन्यात लस उपलब्ध झाल्याची माहिती दिली आहे. राहुल गांधींची समस्या काय आहे? ते वाचत नाहीत का? त्यांना समजत नाही का? अहंकार आणि अज्ञानाच्या व्हायरसची कोणतीही लस नाही. काँग्रेसने आपल्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या हाताळणीवर लक्ष देण्याची गरज आहे."

दुसरीकडे, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, लसीचे 12 कोटी डोस जुलै महिन्यात उपलब्ध होतील जे खासगी रुग्णालयांच्या पुरवठ्यापेक्षा वेगळे आहेत. राज्यांना 15 दिवस अगोदर पुरवठ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. राहुल गांधींना समजले पाहिजे की कोरोनाविरूद्धच्या लढाईत गांभीर्याऐवजी क्षुद्र राजकारण करणे योग्य नाही.

दरम्यान, देशात कोरोना लसीकरण अभियान ज्या वेगाने सुरू आहे, त्या दृष्टीने आम्ही असे म्हणू शकतो की डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशामध्ये लसीकरण केले जाईल. आतापर्यंत देशातील 35 कोटींहून अधिक लोकांना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.

Web Title: congress leader rahul gandhi attacks on centre over vaccination drive