छत्रपती शिवराय द्रष्टे नेते - नरेंद्र मोदी
By Admin | Updated: August 16, 2014 11:15 IST2014-08-16T10:39:16+5:302014-08-16T11:15:59+5:30
छत्रपती शिवरायांनी व्यापार वृद्धीसाठी समुद्र संरक्षणाची, आरमाराची गरज सर्वप्रथम ओळखली होती, त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच आजही देशाच्या सागरी सीमेचे संरक्षण होत आहे, असे सांगत 'शिवाजी महाराज' द्रष्टे नेते होते असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले

छत्रपती शिवराय द्रष्टे नेते - नरेंद्र मोदी
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १६ - छत्रपती शिवरायांनी व्यापार वृद्धीसाठी समुद्र संरक्षणाची, आरमाराची गरज सर्वप्रथम ओळखली होती, त्यांच्या दूरदृष्टीपणामुळेच आजही देशाच्या सागरी सीमेचे संरक्षण होत आहे, असे सांगत 'शिवाजी महाराज' द्रष्टे नेते होते असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले. तसेच व्यापारासाठी सागरी सुरक्षा अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले. 'आयएनएस कोलकाता' या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
आजच्या युगात बाहुबळापेक्षा बुद्धीबळाची जास्त आवश्यकता असल्याचे सांगत 'आयएनएस कोलकाता' हे भारताच्या बौद्धिक क्षमतेचे प्रतिक आहे असेही ते म्हणाले. या युद्धनौकेद्वारे जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन झाले असल्याचे सांगत आता कोणाचीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माझगाव गोदीमध्ये तयार केलेल्या आयएनएस कोलकता या युद्धनौकेचे नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी संरक्षण मंत्री अरूण जेटली, महाराष्ट्राचे राज्यपाल शंकर नारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नौदलप्रमुख रॉबिन धवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले,' काल आपण देशाचा स्वातंत्र्यदिन सोहा साजरा केला, मात्र देशाचे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी लष्कर, नौदल व वायुदलाचे जवान अखंड झटत असतात. टेक्नॉलॉजीच्या आजच्या युगात फक्त बाहुबळाची नव्हे तर बौद्धिक बळाची देखील गरज असते. आयएनएस कोलकाता या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौकेमुळे देशाचे सामर्थ्य वाढले असून नौदलाचे मनोधैर्यही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयएनएस कोलकता ही युद्धनौका प्रकल्प १५-अल्फा साखळीतील आहे. एकाच वेळी १६ ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेली भारताची ही पहिलीच युद्धनौका आहे.