एकतर्फी प्रेमातून भर मंडपात वधूची हत्या
By Admin | Updated: May 9, 2014 14:21 IST2014-05-09T14:21:25+5:302014-05-09T14:21:48+5:30
एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने भर मंडपातच वधूची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना भोपाळमध्ये घडली.

एकतर्फी प्रेमातून भर मंडपात वधूची हत्या
>ऑनलाइन टीम
भोपाळ, दि. ९ - एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने भर मंडपातच वधूची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना भोपाळमध्ये घडली. वधूवर गोळीबार केल्यावर तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मात्र उपस्थितांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा प्रयत्न फसला.
भोपाळमध्ये राहणा-या जयश्री नामदेव या तरुणीचा गुरुवारी संध्याकाळी विवाह होता. जयश्री तिच्या भावी पतीसह मंचावर शुभेच्छा स्वीकारत होती. या दरम्यान अनुराग सिंह हा तरुण मंचावर गेला व क्षणार्धात त्याने खिशातून पिस्तूल काढून जयश्रीवर गोळी झाडली. मंचावर उपस्थित लोकांनी अनुरागच्या दिशेने धाव घेत त्याला पकडले. या दरम्यान अनुरागने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी त्याला रोखले व चोपून पोलिसांच्या हवाली केले. दुसरीकडे जयश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशीरा उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. लग्नमांडवात ही दुर्दैवी घटना घडल्याने शहरात खळबळ माजली आहे.
अनुराग हा जयश्रीच्या आत्येचा मूलगा असून तो मध्यप्रदेशमधील सागर येथे राहतो. त्याने एकतर्फी प्रेमातूनच हे कृत्य केल्याचा कयास पोलिसांनी वर्तवला आहे.