"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 21:38 IST2025-08-02T21:36:37+5:302025-08-02T21:38:12+5:30
Pragya Singh Thakur News: २००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
२००८ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांची विशेष एनआयए कोर्टाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली आहे. त्यानंतर आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. अटक करण्यात आल्यानंतर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी आपला छळ करण्यात आला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी प्रथमच जाहीरपणे असा दावा केला आहे. मात्र एनआयए कोर्टाने दिलेल्या १०३६ पानांच्या निकालपत्रामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही आरोपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. प्रज्ञा सिंह ठाकूर आज भोपाळ सत्र न्यायालयामध्ये जामिनाच्या अटीनुसार सुरक्षेबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील गंभीर आरोप केले. तसेत आपला तुरुंगात असताना छळ करण्यात आल्याचा दावा केला.
प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, त्यावेळी मी सूरत येथे राहत असल्याने त्यांनी मला नरेंद्र मोदींचं नाव घेण्यास सांगितले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, इंद्रेशजी, राम माधव आणि इतर प्रमुख नेत्यांची नावं घेण्यासाठी दबाव आणला. मात्र मी खोटं बोलण्यास नकार दिला.
तेव्हा सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारवर टीका करतान प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, काँग्रेस हे या संपूर्ण खोट्या प्रकरणामागे आहे. हा भगवा रंग आणि सशस्त्र दलांना बदनाम करण्याच्या व्यापक कटाचा भाग आहे. दरम्यान, तत्कालिन एसीपी परमबीर सिंह, तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे आणि अधिकारी सुखविंदर सिंह यांना आपला छळ केल्याचा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला आहे.