आम आदमीमुळेच भाजपला यश - भागवत
By Admin | Updated: August 11, 2014 10:57 IST2014-08-11T09:33:48+5:302014-08-11T10:57:09+5:30
लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी हे यश 'आम आदमी'चे आहे असे म्हटले आहे.

आम आदमीमुळेच भाजपला यश - भागवत
>ऑनलाइन टीम
भुवनेश्वर, दि. ११ - लोकसभेत भाजपच्या यशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमित शहांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यामताशी असहमतीच दर्शवली आहे. हे एका व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेमुळे मिळालेले यश नसून आम आदमीमुळे मिळालेले यश आहे. सर्वसामान्य भारतीयाला बदल हवा असल्यानेच हे यश मिळू शकले असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे.
भुवनेश्वर येथे संस्कृती सुरक्षा समितीतर्फे रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाशी विसंगत भूमिका मांडली. भागवत म्हणाले, काही लोक म्हणतात की पक्षाला यश मिळाले. तर काही लोक म्हणतात एका व्यक्तीसाठी हे यश मिळाले. मात्र प्रत्यक्षात एका व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेमुळे हे यश मिळालेले नाही. आम आदमीला बदल हवा होता व त्यांनीच हे परिवर्तन घडवून आणले. 'यश मिळवणारी व्यक्ती, पक्ष यापूर्वीही अस्तित्वात होते. पण मग ते याआधीच निवडून का आले नाही असे सवालही त्यांनी उपस्थित केला. जर लोकं आनंदात नसतील तर पुढील लोकसभा निवडणुकीत ते पुन्हा सत्ताबदल करतील असे भागवत यांनी नमूद केले.
जर्मनीत राहणारे जर्मन, अमेरिकेत राहणारे अमेरिकी तर भारतात राहणारे हिंदू का होऊ शकत नाही असा सवाल मोहन भागवत यांनी अन्य एका कार्यक्रमात उपस्थित केला.