भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांची निवड मागच्या बऱ्याच काळापासून खोळंबलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर या निवडीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पक्षाने काही महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह तीन राज्यांमधील निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांची महाराष्ट्रामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाकडून या संदर्भातील पत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांसाठीही भाजपाकडून निवडणूक अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांची उत्तराखंडमधील निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांची पश्चिम बंगालमधील निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.