भाजपशी युतीला आता उशीर झाला : द्रमुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 23:30 IST2017-11-09T23:25:34+5:302017-11-09T23:30:57+5:30
द्रमुकशी युती होऊ शकते, असे भाजपच्या सूत्रांनी म्हटले असले तरी आता खूप उशीर झाला, असे त्याच्या नेत्यांनी म्हटले.

भाजपशी युतीला आता उशीर झाला : द्रमुक
चेन्नई : द्रमुकशी युती होऊ शकते, असे भाजपच्या सूत्रांनी म्हटले असले तरी आता खूप उशीर झाला, असे त्याच्या नेत्यांनी म्हटले.
द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. ही भेट अराजकीय होती, की २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीसाठी या दोन्ही पक्षांत जवळीक वाढत असल्याचे संकेत त्यांनी दिले? द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीला दुबळे करण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचे द्रमुकसोबत असलेल्या पक्षांचे मत आहे. मोदी यांनी करुणानिधी यांना आपल्या दिल्लीतील निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले.
द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम.के. स्टालीन यांनी भाजपसोबत युतीसाठी कोणतीही बोलणी असल्याचे लगेचच नाकारले. दोन दिवसांपूर्वी भाजपच्या विरोधातील द्रमुक आणि त्याच्यासोबतच्या पक्षांनी तामिळनाडूत ८ नोव्हेंबर हा ‘काळा दिवस’ पाळण्याची तयारी सुरू केली होती; परंतु मोदी-करुणानिधी भेटीने त्यांच्या छावणीत संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकसभेसाठी अखिल भारतीय अण्णाद्रमुकसोबत युती करण्याची भाजपची सगळी तयारी झाल्याचे दिसत असले तरी नुकत्याच झालेल्या जनमत चाचणीत त्या पक्षाच्या विश्वासार्हतेची पातळी फारच खालावल्याचे दिसल्यानंतर भाजपने दिशा बदलली व जिंकणाºया घोड्यासोबत जायचे ठरवले. द्रमुकसोबत १९९९ व २००४ मध्ये आमची युती होतीच. त्यामुळे आता युती करण्यात काहीच चूक नाही, असे सूक्ष्म संकेत भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत.
द्रमुकने १९९६ आणि १९९८ मध्ये भाजपविरोधात निवडणूक लढवली होती; परंतु १९९९ मध्ये जयललिता यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील सरकार एक मताने पाडल्यानंतर भाजप द्रमुकच्या जवळ गेला होता.