बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 22:17 IST2025-11-14T22:16:45+5:302025-11-14T22:17:17+5:30

बिहार निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bihar results are truly shocking; Will thoroughly review the defeat: Rahul Gandhi | बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले, ज्यात एनडीएने मोठा विजय मिळवला आहे, तर महागठबंधनला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणूक निकालांवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले 'निकाल धक्कादायक'

राहुल गांधी यांनी बिहारच्या मतदारांचे आभार मानले, ज्यांनी महागठबंधनवर विश्वास दाखवला. मात्र, निवडणुकीच्या निकालावर त्यांनी मोठे विधान केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "मी बिहारमधील कोट्यवधी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच धक्कादायक आहे. आम्ही अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती.हा लढा संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी आहे. काँग्रेस पक्ष आणि  इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक प्रभावी करेल."

संवैधानिक संस्थांचा गैरवापर करणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा सुरूच!

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी बिहारच्या जनतेचा निर्णय मान्य करत लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. "आम्ही बिहारच्या जनतेच्या निर्णयाचा आदर करतो आणि संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही कमकुवत करू पाहणाऱ्या शक्तींविरुद्ध आमची लढाई सुरूच ठेवू. आम्ही निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करू आणि निकालांच्या कारणांचा अभ्यास केल्यानंतर सविस्तर भूमिका मांडू."

कार्यकर्त्यांसाठी संदेश

खरगे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना हताश न होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "बिहारमध्ये महागठबंधनला साथ देणाऱ्या मतदारांचे आम्ही ऋणी आहोत. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगू इच्छितो की, तुम्ही निराश होण्याची गरज नाही. तुम्ही आमची शान आहात आणि तुमची कठोर मेहनत आमची ताकद आहे. आम्ही जनतेला जागरूक करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. जनतेत राहून संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा हा संघर्ष आम्ही सुरूच ठेवू. हा संघर्ष मोठा आहे आणि आम्ही तो पूर्ण निष्ठा, धैर्य आणि सत्यतेने लढू."

राजदचीही आढावा बैठक

दरम्यान, आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, पक्ष शनिवारी बैठक घेऊन निवडणुकीतील कामगिरीचा आढावा घेईल. काय चूक झाली, आमच्या त्रुटी काय राहिल्या, या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : बिहार चुनाव परिणाम चौंकाने वाले; हार की समीक्षा करेंगे: राहुल गांधी

Web Summary : राहुल गांधी ने बिहार चुनाव परिणामों को चौंकाने वाला बताया, महागठबंधन पर मतदाताओं के विश्वास के बावजूद। उन्होंने हार की गहन समीक्षा करने और संवैधानिक निकायों के दुरुपयोग के खिलाफ लोकतंत्र की रक्षा के लिए लड़ाई जारी रखने का संकल्प लिया। राजद भी समीक्षा बैठक करेगा।

Web Title : Bihar Election Results Shocking; Defeat Will Be Reviewed: Rahul Gandhi

Web Summary : Rahul Gandhi calls Bihar election results shocking, despite voters' trust in the Mahagathbandhan. He pledges a thorough review of the defeat, continuing the fight to protect democracy against misuse of constitutional bodies. RJD will also hold a review meeting.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.