कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर यांनी मोठा दावा केला आहे. रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूच्या विजयोत्सवासाठी जवळपास 8 लाख लोक चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचले होते. यामुळे तेथे मोठी गर्दी होऊन बुधवारी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला तर 47 जण जखमी झाले आहेत. परमेश्वर म्हणाले, "आम्ही विधान सौधाबाहेर (विधानसभा) एक लाख लोक आणि स्टेडियमबाहेर 25,000 कोल असतील असा अंदाज बांधला होता. मात्र आम्हाला 2.5 लाख लोकांचीही अपेक्षा नव्हती. 8.70 लाख मेट्रो तिकिटे विकली गेली. यावरून जवळपास ८ लाख क्रिकेट चाहते पोहोचले असावेत, असा अंदाज आहे."
13 वर्षांच्या मुलीसह सर्व मृत 40 वर्षांहून कमी वयाचे -या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून यात अधिकांश तरुणच होते. मृतांमध्ये 13 वर्षीय दिव्यांशी, 17 वर्षीय शिवलिंगा, 19 वर्षीय चिन्मयी, 20 वर्षीय भूमी आणि प्रज्वल, 25 वर्षीय साहना, 27 वर्षीय अक्षता, 29 वर्षीय देवी, 32 वर्षीय डोरेशा आणि 33 वर्षीय मनोज यांचा समावेश आहे. हे सर्व लोक बंगळुरू आणि जवळपासच्या जिल्ह्यातून RCB च्या पहिल्या विजयाचे ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्यासाठी पोहोचले होते.
फ्री पासच्या घोषणेमुळे वाढली गर्दी -आरसीबीने बुधवारी दुपारी साधारणपणे 3:14 वाजता सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोफत पास उपलब्ध करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. या घोषणेनंतर स्टेडियमजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी निर्माण झाली. प्रवेशासाठी कुठळ्याही प्रकारचा स्पष्ट प्रोटोकॉल नसल्याने आणि तिकट नियंत्रण नसल्याने हजारो लोकांनी एकाचवेळी कार्यक्रमस स्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. माध्यमांतील वृत्तांनुसार, अनेकांनी बॅरिकेड्स आणि गेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केला, यावेळी काही लोक पडून गर्दीखाली चिरडले गेले.
विधान सौधा येथे व्यस्त होते पोलीस -गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल आरसीबी संघाला विधान सौधा येथे भेटणार होते. यामुळे तेथील सुरक्षिततेसाठी मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले होते. यामुळे, स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात पोलिसांची कमतरता होती. परिणामी गर्दी नियंत्रित करणे अशक्य झाले.