बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:04 IST2025-06-05T16:00:38+5:302025-06-05T16:04:04+5:30
Bangalore stampede news today: बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११ जणांचा मृत्यू झाला. मोफत पास वाटले जात असल्याच्या एक अफवेने देवीचाही जीव घेतला.

बॉसला विनवणी करून घेतली सुट्टी, स्टेडियमजवळ पोहोचली अन् देवी परत आलीच नाही
Bangalore stampede News Update: विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची ती खूप मोठी चाहती होती. बंगळूरूचे सामने बघायला जायची. आरसीबीने १८ वर्षांनी आयपीएल जिंकल्यामुळे ती खूप आनंदतही होती. त्यामुळे आरसीबीची विजयी रॅली आणि स्टेडियममध्ये होणाऱ्या सेलिब्रेशनचं तिला साक्षीदार व्हायचं होतं. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. विनवणी करून तिने बॉसकडून काही तासांसाठी सु्ट्टी घेतली आणि गेली. पण, ती परतलीच नाही. त्या गर्दीत तिचाही जीव गेला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आरसीबीच्या आयपीएल विजयाच्या आनंदोत्सावाला गालबोट लागले. बंगळुरूमध्ये बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅली नंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर सेलीब्रेशन झाले. पण, स्टेडियमबाहेर प्रचंड गर्दी झाली. त्यात एक अफवा उडाली आणि तब्बल ११ जणांचा जीव गेला. त्यात एक होती, देवी.
काही तासांची सुट्टी घेऊन गेली अन्...
देवी बंगळुरूतील एका आयटी कंपनीमध्ये कामाला होती. आरसीबीची विजयी रॅली बघण्यासाठी तिने बॉसला विनवणी केली. त्यानंतर काही तासांची तिला सुट्टी मिळाली. लॅपटॉप डेस्कवर तसाच ठेवून दुपारी २.३० वाजता चिन्नास्वामी स्टेडियमकडे निघाली. स्टेडियमच्या बाहेर आल्यानंतर ती गर्दी शिरली. त्याचवेळी मोफत पास वाटल्या जात असल्याची अफवा उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. यात ११ जणांचा जीव गेली, त्यात देवीही होती.
क्रिकेटप्रेमी देवीने तिकीट मिळवण्याचा केला होता प्रयत्न
देवीच्या मृत्यूच्या घटनेने तिच्या ऑफिसमध्ये सगळ्यांनाच धक्का बसला. तिचा लॅपटॉप डेस्कवर तसाच आहे. ऑफिसमधून निघताना देवी तिच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना म्हणाली होती, 'मी स्टेडियमला मेट्रोने जाणार आहे.' हेच तिचे शेवटचे शब्द होते.
देवीला क्रिकेटची आवड होती. बंगळुरूमध्ये आल्यानंतर ती सामने बघायला जायची. आरसीबीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी तिने तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिकीट मिळालं नाही.
देवी ऐनवेळी स्टेडियमजवळ आली. ती गर्दीत असतानाच एक अफवा उडाली की, मोफत पास दिले जात आहेत. गर्दी अनियंत्रित झाली आणि अनेकजण गर्दीच्या पायाखाली आले. यात ११ जणांचा मृत्यू झाला. आनंदात ऑफिसमधून निघालेली देवीही याच चेंगराचेंगरीत गेली. ४० हजार क्षमता असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हा सोहळा झाला. तो बघण्यासाठी स्टेडियमबाहेर तब्बल अडीच ते तीन लाख लोकांनी गर्दी केली होती.