भारतातर्फे बांगलादेशला वीजपुरवठा सुरू
By Admin | Updated: March 24, 2016 00:43 IST2016-03-24T00:43:25+5:302016-03-24T00:43:25+5:30
द्विपक्षीय संबंधातील एक नवा अध्याय सुरू करताना भारताने बुधवारी इंटरनेट बँडविड्थच्या मोबदल्यात बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. बँडविड्थमुळे ईशान्येकडील राज्यांना जोडण्यास मदत मिळेल

भारतातर्फे बांगलादेशला वीजपुरवठा सुरू
आगरतळा/नवी दिल्ली : द्विपक्षीय संबंधातील एक नवा अध्याय सुरू करताना भारताने बुधवारी इंटरनेट बँडविड्थच्या मोबदल्यात बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. बँडविड्थमुळे ईशान्येकडील राज्यांना जोडण्यास मदत मिळेल. हे ऐतिहासिक पाऊल, असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
भारत दहा गिगाबाईट्स प्रति सेकंद इंटरनेट बँडविड्थच्या बदल्यात बांगलादेशला १०० मेगावॅट विजेचा पुरवठा करेल. मोदी आणि बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या दोहोंची सुरुवात केली. भारतासोबत अंतराळ सहकार्य क्षेत्रात सामील होण्याचे बांगलादेशला आमंत्रण देताना मोदी म्हणाले, ‘माझ्या मते हे ऐतिहासिक पाऊल आहे. भारत बांगलादेशच्या विकासात त्या देशासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत आणि आज एक नवा अध्याय प्रारंभ झाला आहे. एकमेकांवरील अवलंबित्वाच्या या युगात दोन्ही देश आपले द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करतील. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही देश विकासाच्या मार्गाला प्रोत्साहित करीत आहेत.’
‘वीजपुरवठा आणि इंटरनेट बँडविड्थच्या माध्यमातून उभय देशांनी द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी आणली आहे,’ असे शेख हसिना म्हणाल्या. त्रिपुरामधून बांगलादेशला १०० मेगावॅट वीज पुरविण्यात येईल. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लिमिटेडने आगरतळाच्या सूर्यामणीनगर ते भारतीय सीमेपर्यंत ४०० केव्ही डीसी लाईन टाकलेली आहे, तर बांगलादेशच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेडने कोमिलापर्यंत लाईन टाकलेली आहे. यामुळे बांगलादेशमार्गे ईशान्येकडील राज्यांना ब्राडबँड संपर्क उपलब्ध करून देण्यासाठी एक नवा गेटवे उघडण्यात आला आहे.