"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:08 IST2025-08-02T14:03:11+5:302025-08-02T14:08:24+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिले आहे.

"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
Rahul Gandhi on Arun Jaitley: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे काँग्रेसकडून राष्ट्रीय कायदेशीर परिषदचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात कृषी कायद्यांबद्दल बोलताना दिवंगत माजी मंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केले. शेतकरी आंदोलनादरम्यान अरुण जेटली यांना धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर लगेचच अरुण जेटली यांच्या मुलाने प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते असं रोहन जेटली यांनी म्हटलं.
देशाच्या शेती क्षेत्रात संबधित तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यात आले होते. शेतकऱ्याकंडून दिल्लीच्या वेशींवर वर्षभर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये ११ बैठका झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे दहा महिन्यांनी केंद्र सरकारने कायदे रद्द केले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. शनिवारी परिषदेमध्ये बोलताना त्यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर गंभीर आरोप केला.
"मला आठवतय जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो, तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकावण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांनी मला सांगितले की जर मी सरकारला विरोध करत राहितो आणि कृषी कायद्यांविरुद्ध लढत राहिलो तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. त्यानंतर मी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटलं की मला वाटत नाही की तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही कोणाशी बोलताय," असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींच्या आरोपानंतर माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी एक्स पोस्टवरुन प्रत्युत्तर दिलं. "राहुल गांधी आता दावा करतात की माझे दिवंगत वडील अरुण जेटली यांनी त्यांना शेती कायद्यांवरून धमकावले होते. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडिलांचे २०१९ मध्ये निधन झाले. शेती कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, विरोधी मतांवरून कोणालाही धमकावणे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवायचे. जर अशी परिस्थिती उद्भवली असती, जसे राजकारणात अनेकदा होते, तर त्यांनी तोडगा काढण्यासाठी सर्वांना चर्चेला बोलवलं असतं. आपल्यासोबत नसलेल्यांबद्दल राहुल गांधी जाणीवपूर्वक बोलले तर मला आवडेल. त्यांनी मनोहर पर्रिकरजींसोबतही असेच काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता," असं रोहन जेटली म्हणाले.