...अन्यथा रेल्वे प्रवास महागणार, सरकारनं केलं 'हे' आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 20:23 IST2019-07-10T20:23:10+5:302019-07-10T20:23:18+5:30
रेल्वेचा प्रवास लवकरच महागणार आहे. आता रेल्वेच्या तिकिटासाठी 43 टक्के जास्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे.

...अन्यथा रेल्वे प्रवास महागणार, सरकारनं केलं 'हे' आवाहन
नवी दिल्लीः रेल्वेचा प्रवास लवकरच महागणार आहे. आता रेल्वेच्या तिकिटासाठी 43 टक्के जास्त रक्कम मोजावी लागण्याची शक्यता आहे. रेल्वे वारंवार कात टाकत असून, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढ करत आहे. या पाच वर्षांत देशांतर्गत रेल्वे स्टेशनसुद्धा विमानतळासारखे तयार करण्यात आले आहेत. रेल्वेकडून प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांसाठी रेल्वे प्रशासनानं ग्राहकांना मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या तयारीत आहे. याचा सरळ सरळ प्रभाव तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांवर पडणार आहे.
रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना सबसिडी सोडण्याबाबत पर्यायाद्वारे विचारले जाणार आहे. त्यावेळी तिकिटांवरील सबसिडी अंशत: किंवा पूर्णत: सोडता येणार आहे. रेल्वे प्रशासनाचा हा प्रस्ताव सध्या अखेरच्या टप्प्यात असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेंतर्गत रेल्वे प्रशासन प्रवाशांना तिकिटांवर मिळणारी सबसिडी सोडण्याची विनंती करणार असून, ती सबसिडी प्रवाशांनी सोडल्यास त्यांना तिकिटासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
रेल्वे प्रवासात किती सबसिडी मिळते, याची माहिती छापील तिकिटावर देण्यात आलेली असते. सध्या रेल्वे प्रत्येक प्रवाशाला 43 तिकीट दरावर 43 टक्के सबसिडी मिळते, आता ती सबसिडी बंद केल्यास तिकिटासाठी जास्तीचे खिशाला कात्री लागणार आहे.