केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 17:35 IST2017-11-12T16:54:03+5:302017-11-12T17:35:30+5:30

केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे.

Another union volunteer killed in Kerala | केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

केरळमध्ये आणखी एका संघ स्वयंसेवकाची हत्या

ठळक मुद्देसंघ प्रचारकांना सुरक्षास्मृति ईराणी यांची टीकाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली चिंता

तिरुअनंतपूरम : केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची हत्या थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमधील त्रिसूरच्या गुरुवायूर भागातील आनंदू या संघ स्वयंसेवकाची हत्या झाल्याची घटना रविवारी समोर आली आहे.

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील इडाक्कड भागात निधीश या स्वयंसेवकावर जीवघेण्या हल्ल्यानंतर आता आनंदू याच्यावर हल्ला करण्यात आला, त्यात आनंदू याचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी त्रिवंद्रम येथे काही गुंडांनी ३४ वर्षीय स्वयंसेवक राजेश याचा धारदार शस्त्राने हात कापला होता, त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती.

जुलै महिन्यातही कन्नूर जिल्ह्यातील संघाच्या कार्यालयावर हल्ले झाले होते. त्यात काही ठिकाणी आग लावल्याचेही निष्पन्न झाले होते. भाजप आणि संघांशी संबंधित काही लोकांच्या दुकांनावरही स्फोट घडवून त्यांना आग लावण्यात आल्याचेही समोर आले होते. या सर्व घटनांची केंद्र सरकारने कडक शब्दात निर्भत्सना केली होती.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने आनंदूच्या हत्येमागे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असल्याचा आरोप केला आहे. आनंदू हा संघाचा स्वयंसेवक आहे आणि तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता फाजिल याच्या हत्येत सहआरोपी असल्याचा आरोप आहे.

संघ प्रचारकांना सुरक्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर होणाºया हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संघ प्रचारकांना सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर संघाचे विभाग प्रचारक शशिधरण यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा देण्यात आली होती.

स्मृति ईराणी यांची टीका

संघ स्वयंसंवकांच्या हत्याविरोधात भाजपने १५ दिवसांची जनरक्षा यात्रा काढली होती. या यात्रेत सहभागी झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी राज्यातील डाव्या सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, केरळमधील डाव्या सरकारने केरळसारख्या सुंदर राज्याला राजकीय स्मशानभूमी बनविली आहे. त्या म्हणाल्या, की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला वाटते असेल, की असल्या हिंसेमुळे आम्ही घाबरु, पण भाजप घाबरणार नाही.

Web Title: Another union volunteer killed in Kerala