Indian National Death in Riyadh: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथल्या विविध देशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, या संघर्षात आतापर्यंत ६ भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी भारतीय दूतावास स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधत आहे.
इराणमधून ९१३ भारतीयांची सुटका
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले की, इराणमध्ये अडकलेले भारतीय नागरिक आता शेजारील आर्मेनिया आणि अझरबैजान देशांच्या जमिनी मार्गाचा वापर करून मायदेशी परतत आहेत. आतापर्यंत ९१३ भारतीयांनी इराणची सीमा ओलांडली असून, त्यात सर्व २८४ भारतीय यात्रेकरूंचा समावेश आहे. हे सर्व यात्रेकरू आता सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.
खाडी देशांतून परतीचा प्रवास सुरू
सौदी अरेबिया, ओमान, इराक आणि संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावास तिथल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. २८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे ३ लाख प्रवासी खाडी देशांतून भारतात परतले आहेत. कुवेत आणि बहरीनची हवाई हद्द बंद असली, तरी प्रवाशांच्या सोयीसाठी सौदी अरेबियातील विमानतळांवरून विशेष विमाने चालवली जात आहेत. कुवेत एअरवेजचे पहिले विशेष विमान कोचीसाठी रवाना होणार आहे. कतारची हवाई हद्द खुली झाल्यामुळे तिथूनही १० विशेष विमाने आज भारतात येतील.
रियाधमधील हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू
१८ मार्च रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये झालेल्या एका घटनेत एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृताचे पार्थिव लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात आहेत.
समुद्री क्षेत्रातून १५ कर्मचाऱ्यांची सुटका
एमटी सेफसी विष्णू या जहाजावरील १५ भारतीय क्रू मेंबर्सची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. हे सर्व कर्मचारी गुरुवारी इराक सोडून सौदी अरेबियामार्गे आज भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी ओमानमधूनही २४ भारतीय खलाशांना सुखरूप मायदेशी आणण्यात आले आहे.
सरकारचे हाय अलर्ट
पश्चिम आशियातील या युद्धाला आता २१ दिवस पूर्ण झाले आहेत. इराक, ओमान आणि यूएई मधील भारतीय दूतावास बेपत्ता असलेल्या एका भारतीयाचा शोध घेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिल्लीत नियंत्रण कक्ष सुरू केला असून, तिथे नागरिक फोन आणि ईमेलद्वारे आपल्या नातेवाईकांची माहिती घेत आहेत.
Web Summary : Amidst Middle East conflict, six Indians died in Saudi Arabia, one missing. Evacuation efforts continue via neighboring countries. Hundreds returned from Iran, and thousands from Gulf states. Search for the missing person intensifies.
Web Summary : मध्य पूर्व संघर्ष में सऊदी अरब में छह भारतीयों की मौत हो गई, एक लापता है। पड़ोसी देशों के माध्यम से निकासी जारी है। ईरान से सैकड़ों और खाड़ी देशों से हजारों लोग लौटे। लापता व्यक्ति की तलाश तेज।