अमित शहांच्या "मिशन बंगाल"मुळे ममतांचा तीळपापड
By Admin | Updated: April 27, 2017 19:23 IST2017-04-27T19:23:12+5:302017-04-27T19:23:12+5:30
शहांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारले असून, आता आपणच दिल्लीवर चाल करणार असल्याचे ममता यांनी म्हटले

अमित शहांच्या "मिशन बंगाल"मुळे ममतांचा तीळपापड
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 27 - आतापर्यंत भाजपाचा फारसा प्रभाव नसलेल्या राज्यांमध्ये पक्षाची पाळंमुळं रुजवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी धडाकेबाज मोहीम हाती घेतली आहे. मणिपूरसारख्या राज्यात पक्षाला सत्तेत आणल्यानंतर अमित शहांनी पश्चिम बंगालवर आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यांनी नुकत्याच केलेल्या बंगाल दौऱ्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अमित शहांमध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. शहांनी दिलेले आव्हान आपण स्वीकारले असून, आता आपणच दिल्लीवर चाल करणार असल्याचे ममता यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांनी पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी येथे भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना तृणमूल काँग्रेस भाजपाच्या विजयसथाला रोखू शकणार नसल्याचे म्हटले होते. त्या भाजपाला रोखण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे अधिक जोमाने कमळ उमलेल. 2019च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा दावा शहा यांनी केला होता.
त्यानंतर शहा यांनी ममता बॅनर्जींचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या भवानीपूरचाही दौरा केला. त्यावेळी तेथील झोपडपट्टी विभागांना शहा यांनी भेट दिली. त्यानंतर 2019 साली बंगालमध्ये मोदींचा विजयरथ धावेल, शहा यांनी पुनरुच्चार केला होता. नक्षलवाडी येथून संपूर्ण देशात नक्षलवाद पसरला. मात्र आम्ही तेथून विकासाची यात्रा सुरू करू असे शहा म्हणाले होते.
तर मंगळवारी कुचबिहार येथील एका सभेला संबोधिक करताना ममता यांनी भाजपा हिंदू धर्माला बदनाम करत आहे, धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहे. असा आरोप केला होता.