अखनूर हल्ल्याची हाफीझ सईदने घेतली जबाबदारी
By Admin | Updated: January 13, 2017 17:13 IST2017-01-13T17:13:04+5:302017-01-13T17:13:04+5:30
पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये बोलताना त्याने अखनूर हल्ला सर्जिकल स्ट्राईक असल्याचे सांगितले.

अखनूर हल्ल्याची हाफीझ सईदने घेतली जबाबदारी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - भारतावर अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणणारा लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीझ सईदने जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 30 भारतीय सैनिकांना मारले असा खोटा दावाही त्याने केला.
सोमवारी अखनूरमधील जीआरईएफच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन कामगार ठार झाले. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये बोलताना त्याने अखनूर हल्ला सर्जिकल स्ट्राईक असल्याचे सांगितले. चौघा दहशतवाद्यांनी अखनूरमधील भारतीय सैन्याचे दहा तळ उद्धवस्त केले आणि हे चारही दहशतवादी सुखरुप परतले असे सांगून त्याने जमलेल्या लोकांची दिशाभूल केली.
सईदचे हे भाषण ऊर्दूमध्ये आहे. सईदने या टेपमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा दावा केल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ शांत राहिले म्हणून मी त्यांना उत्तर दिले असे सईदने सांगितले.