Air India Plane Crash Update: १२ जून रोजी एअर इंडियाच्या विमानाचाअपघात झाला. अपघातानंतर स्फोट होऊन आग लागल्याने विमानातील सर्वच व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे सध्या डीएनएच्या आधारे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ९२ डीएनए नमुने जुळले आहेत. पण, ओळख ८७ जणांची पटली आहे. याचेही कारणही डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गेल्या चार दिवसांत २५० मृतदेहाचे डीएनएसाठी नमुने घेण्यात आले. त्यापैकी ९२ नमुने जुळले आहेत. ज्यांची ओळख पटली, असे ४७ मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत हे मृतदेह त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवले जात आहेत.
९२ डीएनए नमुने जुळले, मग ८७ जणांची ओळख का पटली?
अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयातील डॉ. रजनीश पटेल यांनी सांगितले की, इथे आणण्यात आलेल्या मृतदेहांपैकी ९२ मृतदेहांचे डीएनए नमुने जुळले आहेत. यात बरेच नमुने एकाच व्यक्तीचे आढळून आले आहेत.
वाचा >>चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
अपघातात काही व्यक्तींच्या शरीराचे अवयव वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या वेगवेगळ्या अवयवचांचे नमुने घेतले जात आहेत. त्यामुळे ८७ जणांचीच ओळख पटली आहे. आतापर्यंत ४७ जणांचे मृतदेह येथून त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत.
विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटली
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतदेह जळालेले असल्याने डीएनएच्या साहाय्याने ओळख पटवण्यात आली. रविवारी (१५ जून) त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांच्यावर सोमवारी राजकोट येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विजय रुपाणी यांचे पार्थिव चार्टर्ड विमानाने अहमदाबादवरून राजकोटला नेण्यात येणार आहे. त्यानंतर अत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून, दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अंत्यसंस्काराला हजर राहणार आहेत.