अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबाद येथून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाच्या एआय १७१ फ्लाईटचा भीषण अपघात झाला. या अपघातात २४१ प्रवाशी मृत पावले. या दुर्घटनेनंतर एअर इंडिया प्रशासन हा नंबर बदलण्याच्या तयारीत आहे. या मागचा हेतू म्हणजे या भयंकर अपघाताची कटू आठवण विसरण्यासाठी केले जाणार आहे. सामान्यत: एका भीषण अपघातानंतर एअरलाईन्स संबंधित उड्डाण संख्येचा वापर करणे बंद करते.
विमान अपघातानंतर एअर इंडियाने आवश्यक पाऊले उचलली आहे. त्यात प्रामुख्याने या दुर्घटनेतील मृत लोकांच्या वारसांना प्रत्येकी १ कोटी मदत जाहीर करण्यात आली आहे. आता यापुढे अहमदाबाद ते लंडनला जाणाऱ्या विमानाचा नंबर AI 171 ऐवजी AI 159 करण्यात आला आहे. १७ जूनपासून बुकिंग प्रणालीत आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. हा फ्लाईट नंबर बदलण्यामागे एक खास हेतू आहे. आकडा बदलल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानातील मृतांच्या कुटुंबांना आणि इतरांनाही त्यातून सावरण्यासाठी मदत मिळेल. एअर इंडिया एक्सप्रेसनेही त्यांची उड्डाणसंख्या IX 171 बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. उड्डाण संख्या १७१ बंद करून अपघातातील मृतांप्रती सन्मान दिला जातो.
याआधी कधी घडले होते?
याआधी २०२० मध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचा कोझीकोडमध्ये अपघात झाला. त्यानंतर संबंधित विमानाची उड्डाण संख्या नंबर वापरण्यास बंद करण्यात आले. या दुर्घटनेत २१ लोक मारले गेले होते. २०१४ साली मलेशियातही हेच घडले होते तेव्हा मलेशियन एअरलाईन्सने कुआंलपूरवरून उड्डाण करणाऱ्या एमएच ३७० चे नाव बदलून एमएच ३१८ केले होते. फ्लाईट एमएच ३७० ही ८ मार्च २०१४ साली रडारवरून गायब झाली होती. या विमानात २३९ प्रवासी होते. आजपर्यंत या विमानाचा पत्ता लागला नाही. त्याशिवाय लायन एअरनेही त्यांच्या फ्लाईट जेटी ६१० चे नाव बदलून जेटी ६१८ केले होते. हे विमान २९ ऑक्टोबर २०१८ मध्ये जावा समुद्रात क्रॅश झाले होते. या विमानात चालकासह एकूण १८९ प्रवासी होते.
नेमका कसा झाला अपघात?
गुरुवारी एअर इंडियाचे AI 171 विमान अहमदाबादहून लंडनसाठी चालले होते. त्यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगाल, १ कॅनडाच्या नागरिकाचा समावेश होता. यात १०३ पुरुष, ११४ महिला आणि ११ मुले, २ नवजात बालकांसह १२ क्रू मेंबर्स होते. टेकऑफनंतर काही क्षणातच हे विमान अहमदाबादच्या एका मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकले. हे विमान ज्या इमारतीला धडकले तिथे ५०-६० निवासी डॉक्टर होते. काहीजण मेसमध्ये जेवत होते. या भीषण दुर्घटनेत मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले.