अहमदाबाद - १२ जून रोजी अहमदाबादमध्ये भीषण विमान अपघात घडला. या अपघातात २५० हून अधिक लोकांचा जीव गेला. या दुर्घटनेतर शनिवारी पहिल्यांदाच नागरी उड्डाण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. एअर इंडिया फ्लाईट एआय १७१ ने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंचीवर पोहचू शकले. ज्यानंतर हे विमान वेगाने खाली आले असं मंत्रालयाने सांगितले.
टेकऑफच्या १ मिनिटांनी पडले विमान, पायलटने दिला होता 'मेडे' कॉल
या पत्रकार परिषदेत नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर केवळ ६५० फूट उंची गाठू शकली. त्यानंतर हे विमान खाली येऊ लागले. पायलटने दुपारी १.३९ वाजता एटीसीला मे डे कॉल दिला होता. एक मिनिटानंतर विमान मेघानीनगर भागातील मेडिकल कॉलेज परिसरात कोसळले. या दुर्घटनेआधी हे विमान पॅरिस-दिल्ली-अहमदाबादला विना कुठल्याही तांत्रिक समस्येशिवाय पोहचले होते असंही त्यांनी सांगितले.
उच्चस्तरीय समितीची स्थापना
एअर इंडिया विमानाच्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती ३ महिन्यात त्यांचा रिपोर्ट सादर करेल. गृह सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश असेल. समिती हा अपघात नेमका कसा घडला त्यामागची कारणे तपासेल. सध्याची एसओपी आणि दिशा निर्देशांचा आढावा घेईल आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय पाऊले उचलावी लागतील याची शिफारस करतील.
ड्रीमलायनरची चौकशी सुरू, ८ विमानांची तपासणी
दरम्यान, DCGA च्या निर्देशानंतर बोइंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची चौकशी होणार आहे. भारतात एकूण ३४ ड्रीमलायनर आहेत ज्यातील ८ विमानांची तपासणी पूर्ण झाली आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात २४२ प्रवासी होते. ज्यातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे केवळ एकमेव प्रवासी या भीषण अपघातातून सुखरूप बचावला. हे विमान ज्या मेडिकल कॉलेज परिसरातील इमारतीला धडकले तिथल्या ४० हून अधिक जणांचा जीव गेल्याची भीती वर्तवली जात आहे.