Air India: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताच्या घटनेनंर Air India च्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे कधी विमानाचे उड्डाण रद्द केले जाते, कधी आपत्कालीन लँडिंग केली जाते, तर कधी विमान दुसऱ्याच ठिकाणी डायव्हर्ट केले जाते. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडली आहे. विमानाच्या केबिनमध्ये अचानक तापमान वाढवल्यामुळे टोकियोला जाणारे विमान कोलकाताकडे वळवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान टोकियोच्या हनेदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेऊन २९ जून रोजी सांयकाळी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. मात्र केबिनमधील तापमान अचानक वाढल्यामुळे विमानाला कोलकाताच्या दिशेने वळवण्यात आले. विमानाची कोलकाता येथे सुरक्षितपणे लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढून विमानाची तपासणी सुरू आहे.
एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, या अनपेक्षित घटनेमुळे होणारी गैरसोय कमी करण्यासाठी कोलकाता येथील आमचे ग्राउंड सहकारी प्रवाशांना आवश्यक ती सर्व मदत करत आहेत. विमानातील प्रवाशांना शक्य तितक्या लवकर परत दिल्लीला नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरीही व्यक्त केली. दरम्यान, यापूर्वी २३ जून रोजी अशाच एका घटनेत एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानातील (AI130) सहा क्रू सदस्यांसह ११ प्रवाशांनी मळमळ आणि चक्कर आल्याची तक्रार केली होती.