गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे उड्डाण करणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ काही मिनिटांतच कोसळले आणि २४२ जिवांची स्वप्न हवेतच विरून गेली. एका क्षणात अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला, तर या अपघातानंतर जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अहमदाबादहून लंडन गॅटविककडे निघालेले एअर इंडियाचे फ्लाईट एआय १७१ हे बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान आज दुपारी उड्डाण करताच काही मिनिटांत मेघाणी नगर भागात कोसळले.
या विमानामध्ये २४२ लोक प्रवास करत होते. या भीषण अपघातामुळे संपूर्ण देशात आणि परदेशातही शोककळा पसरली आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी आता गुजरात सरकारने प्रवाशांच्या कुटुंबाला डीएनए नमुने देण्याचे आवाहन केले आहे.
उड्डाणानंतर सात मिनिटांत अपघातसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले होते. अवघ्या सात मिनिटांत, म्हणजे १.४६ वाजता, विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. त्यानंतर काही क्षणातच विमानाने ‘मेडे कॉल’ पाठवला आणि काही मिनिटांतच विमान मेघाणी नगर भागातील एका इमारतीजवळ कोसळले.
२४२ लोकांची स्वप्न उद्ध्वस्त!या विमानात २३० प्रवासी, १० केबिन क्रू आणि २ पायलट होते. विमान कोसळल्यानंतर परिसरात तीव्र स्फोटाचा आवाज झाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात पसरले. घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि आपत्कालीन सेवा दाखल झाल्या आणि त्यांनी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले.
मृतदेह ओळखणेही कठीणअपघातानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये घटनास्थळी विखुरलेले मृतदेह, विखंडित अवस्थेत विमानाचे अवशेष आणि परिसरात माजलेला हाहाकार दिसून येत आहे. अनेक मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाल्याने, गुजरात सरकारने नातेवाईकांना डीएनए नमुने देण्याचे आवाहन केले आहे.
अनुभवी पायलट गमावलेकॅप्टन सुमित सभरवाल हे विमान चालवत होते. त्यांना ८२०० तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या सोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते, ज्यांना ११०० तासांचा अनुभव होता. एअर इंडियाने प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक १८०० ५६९१ ४४४ जाहीर केला आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे.