कार्बनचा स्तर ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य

By Admin | Updated: October 4, 2015 02:51 IST2015-10-04T02:51:36+5:302015-10-04T02:51:36+5:30

संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध

Aim to reduce carbon emissions by 35 percent | कार्बनचा स्तर ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य

कार्बनचा स्तर ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. पॅरिस येथे होऊ घातलेल्या वातावरण बदल परिषदेपूर्वी भारताने या महत्त्वाकांक्षी योजनेला बळकटी दिली आहे.
२००५ ते २०३० या काळात ३५ टक्के कार्बन कपातीचे उद्दिष्ट ठेवताना भारताने स्वेच्छेने घोषित केलेल्या क्षमतेत ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
येथे पत्रपरिषदेत या योजनेची घोषणा करताना जावडेकर म्हणाले की, भारताने स्वेच्छेने निर्धारित केलेले योगदानाचे लक्ष्य म्हणजे ‘आयएनडीसी’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून, त्यामागे सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे.
व्यापक, प्रगतीशील आणि सातत्यपूर्ण विकासाला प्रोत्साहन देतानाच आपण २०२०पर्यंत कार्बन उत्सर्जनाचा स्तर २० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते.
२०३०पर्यंत कार्बनचे प्रमाण ३३ ते ३५ टक्क्यांनी कमी केले जाणार असून, कपातीचे लक्ष्य जवळपास ७५ टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

काय आहेत योजनेची वैशिष्ट्ये
२०३०पर्यंत बिगर जीवाश्म ऊर्जेचा वाटा वाढून ४० टक्के करण्याचे उद्दिष्ट.
अतिरिक्त जंगलांचा विकास करीत २.५ ते ३ अब्ज टन कार्बन डायआॅक्साईडच्या बरोबरीने कार्बन सिंक तयार करणे. त्यामुळे ३.५९ अब्ज टन कमी कार्बन उत्सर्जित होईल.
भारताच्या वातावरण बदल कृती योजनेसाठी २.५ अब्ज अमेरिकन डॉलरचा खर्च अपेक्षित.
३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या काळात पॅरिस येथे होणाऱ्या वातावरण बदल परिषदेसाठी सर्व देशांना आयएनडीसी घोषित करणे अनिवार्य.

Web Title: Aim to reduce carbon emissions by 35 percent