Ahmedbad Plane Crash, Air India Eye Witness: अहमदाबादहून लंडनला निघालेले विमान गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास टेकऑफ घेतल्यावर लगेचच कोसळले ( Ahmedabad Plane Crash ) आणि मोठी दुर्घटना घडली. एअर इंडियाचे ( Air India ) बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान एआय-१७१ असे हे विमान होते. अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाला. हे विमान अवघ्या तीन मिनिटांत एक मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर जाऊन आदळले. त्यामुळे विमानातील प्रवासी आणि हॉस्टेलमध्ये तेव्हा उपस्थित असलेले लोक यांचाही मृत्यू झाला. याच हॉस्टेलमधून अपघाताच्या अवघ्या ४० सेकंद आधी बाहेर पडलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने या दुर्घटनेतील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितले.
प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, विमान वर गेलं आणि लगेच खाली येऊन आदळलं. मी केवळ ४० सेकंदाच्या फरकाने वाचलो. नाहीतर मीदेखील त्यांच्यासोबत मेलो असतो. आतमध्ये सगळे विद्यार्थी लंच टाइममध्ये जेवत होते. आत सिलेंडरदेखील होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर मी लगेच माझ्या मित्रांना फोन केला. आम्ही सगळे लोक कॅन्टीनमध्ये घुसलो. आम्ही पाहिलं तेव्हा विमानातील सामानाच्या खाली भिंत आणि त्याखाली जेवता-जेवता ढिगाऱ्याखाली अडकलेले विद्यार्थी होते. एक मृतदेह तर असा होता, ज्यात त्या व्यक्तीच्या हातात चमचा होता, तो बिचारा जेवत होता त्यावेळी त्याला मरण आलं, अशी हृदयद्रावक घटना त्याने पीटीआयशी बोलताना सांगितली.
त्याने पुढे सांगितले की, आमच्या मित्रांच्या ग्रुपने सर्वात आधी सिलेंडर बाहेर काढले. कारण सिलेंडर आत असते तर अजून मोठा ब्लास्ट झाला असता. त्यामुळे सिलेंडर बाहेर आणले, त्यानंतर मृतदेह बाहेर काढले. एका मित्राच्या पायात काचा रुतल्या होत्या, तरीही त्याने त्याची पर्वा न करता लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
मी आतमध्ये होते त्यावेळी केवळ आग वाढत चालली होती. फायर एस्टींगविशर काम करत नव्हते. अखेर आम्ही जवळपास १०-१५ मृतदेह बाहेर काढले. त्यापैकी दोघे आमचे मित्रच होते. त्या दोघांचाही मृत्यू झाला. आमच्यासमोर जे घडलं ते पाहून आम्हालाच वाईट वाटत होतं, असेही तो मुलगा म्हणाला.