Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग 787 ड्रीमलायनर विमानाचा भीषण अपघात झाला. 242 प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारे विमान टेकऑफनंतर लगेच कोसळले. या अपघातात आतापर्यंत 295 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विमान अपघातानंतर बचाव कार्यही पूर्ण झाले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की, विमान कोसळताच इंधनाने पेट घेतला आणि संपूर्ण परिसर आगीच्या विळख्यात आला. यामुळे विमानाच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान सुमारे 1,000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. भीषण आगीमुळे बचाव कार्य करण्यात अनेक अडचणी येत होत्या.
एसडीआरएफच्या आणखी एका अधिकाऱ्याने दावा केला की, तापमान इतके वाढले की कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनास्थळी असलेले कुत्रे आणि पक्षीही आगीत जळून खाक झाले. त्यांनाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी), तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील पथकांकडून आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आढावापंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अपघातस्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि अनेक उच्च अधिकाऱ्यांनी परिस्थिती सविस्तरपणे समजावून सांगितली. यानंतर, पंतप्रधानांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमींची भेट घेतली. पंतप्रधानांनी जखमींना धीर दिला आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधानांपूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी गुरुवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला होता.