अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा अपघात झाला आणि देशभरात हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. एअर इंडियाच्या या विमानात २४२ जण होते, तर हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टलला धडकल्याने त्यात २० हून अधिक इंटर्न डॉक्टर देखील मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले जात आहे. अशातच या विमानात पश्चिम भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती होते, असे देखील सांगितले जात आहे.
दुपारी १:३९ वाजता अहमदाबाद विमानतळाच्या धावपट्टी २३ वरून एअर इंडियाचे हे विमान लंडनसाठी झेपावले होते. परंतू, पुढच्या तीन मिनिटांतच विमानाचे इंजिन बंद पडले आणि पायलटने विमान तसेच विमानतळाच्या दिशेने वळविले. परंतू, विमान खूपच खाली असल्याने विमानतळापर्यंत पायलट विमान पोहोचवू शकला नाही. यामुळे हे विमान नागरी वस्तीवर कोसळले. हॉस्टेलला धडकल्याने इंटर्न डॉक्टरांनाही जीव गमवावा लागला आहे.
या विमानात महाराष्ट्रातील पाच ते सहा जण असल्याचे सांगितले जात आहे. सुनील तटकरे यांच्या भाच्याची पत्नी या विमानाची क्रू मेंबर होती. नागपूरमधील एक महिला जिचे लग्न अहमदाबादला झाले होते ती देखील तिचा लहान मुलगा आणि सासूसोबत प्रवास करत होती.तसेच सोलापूरचे पत्नी-पत्नी लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. अशातच गुजरातचे तीन महत्वाचे व्यक्ती देखील या विमानातून प्रवास करत होते.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच या विमानात टाटाच्या मोठ्या प्रमाणावर डीलरशीप असलेले कार्गो मोटर्स ग्रुपचे संस्थापक प्रमुख नंदा आपल्या दोन मुले आणि पत्नीसह लंडनला जात होते. तसेच आणखी एक मोठी कंपनी लुबी मोटर्स पंपचे संचालक सुभाष अमीन देखील प्रवास करत होते.
प्रमुख नंदा यांची पत्नी नेहा नंदा, मुलगा प्रवेश नंदा आणि प्रयास प्रमुख नंदा यांच्यासोबत प्रवास करत होते. या सर्वांची नावे या विमानात बसलेल्या प्रवाशांच्या यादीत आहेत. अद्याप मृतांची यादी जाहीर झालेली नसल्याने अधिकृतरित्या काहीही सांगितले जात नसले तरी त्यांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.