'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:13 IST2025-07-30T11:13:19+5:302025-07-30T11:13:43+5:30
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले.

'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा मोठा प्रयत्न भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. या भागात संशयास्पद हालचाली जाणवल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई केली.
सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करताना दिसले. जवानांनी तातडीने कारवाई केली आणि जोरदार गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन महादेवनंतर, लष्कराने सांगितले की त्यांचे ऑपरेशन शिवशक्ती सुरू झाले आहे.
या घटनेची माहिती देताना, भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्ब्सने ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "ऑपरेशन शिवशक्ती. नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केले. जलद कारवाई आणि अचूक गोळीबारामुळे त्यांचे नापाक मनसुबे उधळले गेले. तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आमच्या गुप्तचर युनिट्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या समन्वित गुप्तचर माहितीच्या आधारे, ऑपरेशन यशस्वी झाले. ऑपरेशन सुरूच आहे."
सुरक्षा दलांनी परिसर पूर्णपणे वेढा घातला आहे आणि परिसरात इतर कोणतेही दहशतवादी लपले नसावेत याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविली जात आहे. पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी वाढवलेल्या दक्षतेचा हा एक भाग आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता.
श्रीनगरच्या बाहेरील भागात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांसह तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार मारल्यानंतर दोन दिवसांनी आजची चकमक झाली. सोमवारी झालेल्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सुलेमान उर्फ आसिफचा समावेश होता, जो पहलगाम हल्ल्याचा मुख्य योजनाकार असल्याचे सांगितले जात होते, ज्यामध्ये २६ जणांना निघृणपणे मारण्यात आले होते. लष्कराने या कारवाईला "ऑपरेशन महादेव" असे नाव दिले होते.