जनता एक्स्प्रेस घसरून ३८ प्रवासी ठार
By Admin | Updated: March 20, 2015 23:58 IST2015-03-20T23:58:47+5:302015-03-20T23:58:47+5:30
वाराणसी जिल्ह्यातील बछरावा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून- वाराणसी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३८ प्रवासी ठार, तर सुमारे १५० जण जखमी झाले.

जनता एक्स्प्रेस घसरून ३८ प्रवासी ठार
रायबरेली : वाराणसी जिल्ह्यातील बछरावा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून- वाराणसी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३८ प्रवासी ठार, तर सुमारे १५० जण जखमी झाले.
सकाळी ९.३० वाजता बछरावा स्थानकाजवळ चालकाने सिग्नल ओलांडल्याची परिणती इंजिन आणि लगतचे दोन डबे रुळावरून घसरण्यात झाल्याचे रेल्वेचे प्रवक्ते अनिल सक्सेना यांनी दिल्लीत सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता, की एका डब्याचा केवळ पोलादी सांगाडा तेवढा उरला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेमंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल व वाहतूक सदस्य अजय शुक्ला यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचा आदेश दिला. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता लखनौचे विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी वर्तवली. लखनौपासून सुमारे ५० कि. मी. अंतरावर हा अपघात झाला.
गावकऱ्यांचा मदतीचा हात
अपघाताचे वृत्त कळताच बछरावा गावाजवळील लोकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीचा हात दिला. अनेक प्रवासी तुटलेल्या डब्यांमध्ये अडकून होते. अनेक प्रवासी वेदनेने विव्हळत आणि मदतीसाठी ओरडत असताना अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टरांच्या चमूने घटनास्थळी धाव घेत प्रथमोपचार केले. डब्याच्या आतील भाग पार चेपून गेल्यामुळे गॅस कटरच्या साह्याने भाग तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेश विधानसभेत मुद्दा
या रेल्वे अपघातानंतर राज्य सरकारने तडकाफडकी मदत पोहोचवली नसल्याचा आरोप बसपाच्या सदस्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी हा मुद्दा उपस्थित केला. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हजर नसल्याची माहिती मिळताच मी गृहमंत्रालयाच्या प्रधान सचिवांना फोन करून त्यामागचे कारण विचारले असता हे दोन्ही अधिकारी सुटीवर असल्याचे त्यांनी सांगितले. यातून सरकार किती गंभीर आहे, हेच दिसून येते असे मौर्य म्हणाले.
रेल्वे अपघाताबद्दल
राष्ट्रपतींना दु:ख
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी उत्तर प्रदेशातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी रायबरेली जिल्ह्यात रेल्वे रुळावरून घसरल्याचे वृत्त कळले. मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्यासह जखमींना वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत मी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना कळविले आहे, असे ते राज्यपाल राम नाईक यांना पाठविलेल्या संदेशात म्हणाले. जखमींच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
मदतीची घोषणा
तपासाचे आदेश देतानाच रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, गंभीर व किरकोळ जखमींना अनुक्रमे प्रत्येकी ५० आणि २० हजार रुपयांची मदत तडकाफडकी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करीत मृतांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. जखमींना रायबरेलीच्या जिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमींना लखनौच्या किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठात दाखल करण्यात आले.
४काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतानाच त्यांनी सरकारकडून पुरेशा मदतीची, तसेच जखमींना योेग्य प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळण्याची आशा व्यक्त केली. त्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
रेल्वे क्रॉसिंगवरील अपघातात ३४६ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : मागील तीन वर्षांत चौकीदार नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर एकूण १४५ अपघात घडले आणि त्यात ३४६ जणांचा मृत्यू झाला. रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी राज्यसभेत खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. यंदा व मागील दोन वर्षांत अशा चौकीदार नसलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर घडलेल्या अपघातांचा तपशील काय? त्यात नेमक्या किती लोकांचा मृत्यू झाला?असा प्रश्न खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत विचारला होता.