भरधाव ट्रकच्या धडकेत 20 ठार
By Admin | Updated: April 21, 2017 20:27 IST2017-04-21T20:27:29+5:302017-04-21T20:27:29+5:30
चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे.

भरधाव ट्रकच्या धडकेत 20 ठार
ऑनलाइन लोकमत
आंध्र प्रदेश, दि. 21 - चित्तूर जिल्ह्यात एक वेदनादायक अपघात घडला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव ट्रकनं विजेच्या खांबाला धडक दिली आहे. या धडकेत 20 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या विचित्र अपघातात विजेचा शॉक लागून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चित्तूरमधल्या येर्पेडू गावात हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचा अचानक ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने तुटवत हा ट्रक थेट जाऊन एका विजेच्या खांबाला धडकला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातातील जखमींना तिरुपती आणि श्रीकालहस्ती येथील रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आलं आहे. विजेच्या तारांचा शॉक लागल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही शहर पोलीस अधीक्षक विजयलक्ष्मींनी व्यक्त केली आहे.
जखमींमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश असून, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्र प्रदेश सरकारने या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं असून, मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं आहे. जखमींची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी, अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून केली आहे.