"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:10 IST2025-09-17T09:04:34+5:302025-09-17T09:10:55+5:30
उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटल्याचे समोर आले. काँग्रेसच्याच काही खासदारांनी व्होटिंग केल्याची जोरात चर्चाही रंगलीये. त्यात आता एका आमदारांना राजकीय बॉम्ब फोडला.

"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
Vice President Election Cross Voting: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने इंडिया आघाडीला धक्का दिला. सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपती बनले, पण या निवडणुकीत मोठा खेळ झाला. तो म्हणजे इंडिया आघाडीची विशेषतः काँग्रेसचीच मते फुटल्याचे निकालानंतर समोर आले. तसे दावेही आता केले जात आहेत. महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील काँग्रेसच्या खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला मतदान केल्याची चर्चा रंगलेली असताना तेलंगणातील बीआरएसचे आमदार पडी कौशिक रेड्डी यांनी राजकीय बॉम्ब फोडला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आदेश दिल्यामुळे काँग्रेसच्या आठ खासदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले, असा दावा त्यांनी केला आहे.
भारत राष्ट्र समितीचे आमदार पडी कौशिक रेड्डी यांनी थेट मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचे नाव घेत खळबळजनक दावा केला आहे. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला (सी.पी. राधाकृष्णन) मतदान केल्याचे तीन खासदारांनी कबुल केले आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशावरून क्रॉस व्होटिंग
"काँग्रेसच्या तीन खासदारांनी मला खासगीमध्ये सांगितले की, उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपला मतदान केलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या आदेशावरून त्यांनी क्रॉस व्होटिंग केलं. ते मला असेही म्हणाले की, एक पत्रकार परिषद घ्या आणि हे सगळ्यांच्यासमोर मांडा", असा गौप्यस्फोट आमदार कौशिक रेड्डी यांनी केला आहे.
१५ खासदार विकले गेले
आमदार रेड्डी यांनीही असाही दावा केला आहे की, मोजक्याच खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं असे नव्हे. मी जेव्हा काँग्रेसमधील माझ्या काही मित्रांना कॉल केला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले होते. विकल्या गेलेल्या खासदारांमध्ये तेलंगणातील 8 खासदारांचाही समावेश आहे", असा खळबळजनक दावा बीआरएसच्या आमदाराने केला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहातील ७८१ खासदार मतदान करण्यास पात्र होते. पण, त्यापैकी ७६७ खासदारांनी मतदान केले. मतमोजणीमध्ये ७५२ मतेच वैध ठरली होती. त्यापैकी ४५२ मते भाजपचे (एनडीए) सी.पी. राधाकृष्णन यांना मिळाली, तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली होती. इंडिया आघाडीचे ३१५ खासदार आहेत. त्यामुळे सुदर्शन रेड्डी यांना ३१५ मते मिळणे अपेक्षित होते. त्यानंतर निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्याचे समोर आले.