केरळमध्ये निपाह विषाणूचे ११ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 00:52 IST2018-05-22T00:52:43+5:302018-05-22T00:52:43+5:30

दोन जिल्ह्यांत लागण; वटवाघळांमुळे फळा-फुलांतून होतो जीवघेण्या रोगाचा प्रसार

11 people of Nipah virus in Kerala | केरळमध्ये निपाह विषाणूचे ११ बळी

केरळमध्ये निपाह विषाणूचे ११ बळी

तिरुवअनंतपुरम : केरळमधील कोळिकोड व मल्लापूरम जिल्ह्यांत भयानक विषाणुने थैमान घातले आहे. निपाह नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे आतापर्यंत १0 जणांचा मृत्यू झाला असून, आणखी किमान २५ जणांच्या रक्ततपासणीत त्यांनाही निपाह विषाणूने ग्रासल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये एका परिचारिकेचाही समावेश आहे.
या निपाह विषाणूमुळे आणखी कोणी दगावू नये, म्हणून केरळ सरकारने केंद्रा सरकारची मदत मागितली असून, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पथकास केरळमध्ये जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. एनसीडीसीचे पथक 'निपाह' विषाणूमुळे प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनची समिती या विषाणूचे मूळ शोधत असून, पुणे येथील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटच्या तपासणी रक्तांच्या तीन नमुन्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आले आहे.
निपाहच्या विषाणूविषयी
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार निपाह विषाणू हा वटवाघळांमुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य व जनावरांत पसरत आहे. मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरात १९९८ साली हा विषाणू आढळून आला होता. या विषाणूला 'निपाह' नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याची लागण झाल्याचे दिसून आले होते. बांग्लादेशात २00४ साली या विषाणूने थैमान घातले होते. (वृत्तसंस्था)

निपाहग्रस्तांची लक्षणे
या विषाणुची लागण झालेल्या रुग्णांना श्वास घेण्यास खूप त्रास होतो. शरीरात जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

लस नाही उपलब्ध : निपाह विषाणूवर अद्याप प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळे, विशेषत: खजूर खाणे टाळावे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत. तसेच आजारी डुकरे व प्राण्यांच्या जवळपास फिरकू नये, असा डॉक्टरांचा सल्ला आहे.

Web Title: 11 people of Nipah virus in Kerala