येवल्यात गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी

By Admin | Updated: May 14, 2014 22:32 IST2014-05-14T18:12:53+5:302014-05-14T22:32:16+5:30

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.

In Yewli, water intensity intensity decreased from last year | येवल्यात गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी

येवल्यात गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी

येवला : तालुक्यात मागील वर्षापेक्षा तुलनेने पाणीटंचाईचा प्रश्न, पालखेडच्या आवर्तनामुळे व प्रशासनाच्या नियोजनामुळे चांगला हाताळला गेल्याने, तीव्रता फारशी जाणवली नाही.
मागील वर्षी १५ मेपर्यंत ४४ गावांसह ३७ वाड्यांवर पाणीटंचाईची झळ जाणवली होती. पाणीटंचाईच्या काळात तत्कालीन परिस्थितीत २५ टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला गेला.
यंदा मात्र पालखेडच्या पाणी आवर्तनाने, चांगलाच दिलासा मिळाला. बोकटे यात्रेनिमित्त पिण्याचे पाणी कालव्यातून फिरले. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली. यंदा तहसीलदार शरद मंडलिक, गटविकास अधिकारी अजय जोशी हे पाणीटंचाईच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मागणी आल्यानंतर संबंधित गावांकडे पाहणी करून टँकरची गरज असल्यास चार दिवसांत टँकरची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरूकेले आहे. यंदा केवळ नऊ गावे आणि तीन वाड्यांनाच पाणीपुरवठा करावा लागत आहे व केवळ चार टँकरद्वारा हा पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत तुलनात्मकदृष्ट्या निश्चितच बदल झाले आहेत.
महालगाव, मुरमी, अहेरवाडी, देवरगाव, तळवाडे, बाळापूर, कासारखेडे, निळखेडे, गुजरखेडे- येवला तालुका पाणीटंचाई नऊ गावे.
घनामाळी मळा (नगरसूल), शिवाजीनगर (तळवाडे), महादेववाडी (सायगाव)- तीन वाड्या.
येवला तालुका- पाणीटंचाई नऊ गावे, तीन वाड्या १५ मेअखेरपर्यंतची परिस्थिती.
येवल्यात गेल्या आठवड्यात पारा ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता, परंतु चार दिवसांपासून पारा तीन ते चार अंशांने खाली उतरला आहे. वातावरण काहीसे ढगाळ आहे. सायंकाळच्या वेळी चांगलीच हवा सुरूआहे. या परिस्थितीमुळे वातावरणात तपमान कमी झाले आहे. यामुळे पाणीटंचाईची तीव्रतादेखील कमी होण्यास मदत होत आहे.
पाणीटंचाई गावे टँकरच्या प्रतीक्षेत
पांजरवाडी, चांदगाव, जायदरे, लहीत या चार गावांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा आहे. या शिवाय तीन वाड्यांची मागणीदेखील मंजुरीसाठी प्रांत कार्यालयातून जिल्हाधिकारी यांच्याकडील मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
सेवाभावी पाणपोई सुरू
येथील गंगादरवाजा भागात किरण घाटकर यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरूकेली आहे. दररोज सकाळी येथील चार माठ पाण्याने भरले जातात. दिवसभर रस्त्याने येणारे जाणारे अनेक नागरिक या पाणपोईचा लाभ घेतात. याशिवाय सिद्धेश्वर हनुमान मंडळ, काबरा चॉरिटेबल ट्रस्ट यांच्यासह अनेक सेवाभावी संस्थांनी पाणपोईची व्यवस्था शहरात केली आहे.
या महिन्याच्या अखेरीस वातावरणात उष्मा वाढला, तर ग्रामीण भागात पाणीटंचाईची गावे आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: In Yewli, water intensity intensity decreased from last year