महिला ‘अर्थ साक्षर’ होण्याची गरज : अजित जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:21 IST2019-05-21T00:20:52+5:302019-05-21T00:21:15+5:30
महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.

महिला ‘अर्थ साक्षर’ होण्याची गरज : अजित जोशी
नाशिक : महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर झाल्या की सजगता वाढेल तसेच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होऊ शकेल, व त्यांची आर्थिक फसवणूकही टळेल, असे प्रतिपादन सनदी लेखापाल अजित जोशी यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ६५वे पुष्प जोशी यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (दि. २०) महिला व ‘अर्थ साक्षरता’ या विषयावर गुंफले. जोशी म्हणाले, पुरुषांच्या तुलनेत महिलांचा आर्थिक बाबतीतील स्वभाव वेगळा आहे. त्या अधिक हिशेबी आणि काटकसरी असतात. पतीकडे आर्थिक व्यवहारांची माहिती मागण्यास त्यांना योग्य वाटत नाही. कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांत लक्ष घालून ते समजून घेणे गरजेचे आहे. महिलांची अर्थ साक्षरता वाढल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास मदत होईल, असे जोशी म्हणाले. महिलांनी निरनिराळ्या आर्थिकव्यवहारांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.पतीचे उत्पन्न किती आहे, ते कसे व कोठून येते, पैसे कोणत्या बँकेत वा कोणत्या शेअर्समध्ये गुंतविले जातात याची जाणीव ठेवणे सहजीवनातील आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी केले. गौरी पटवर्धन यांनी परिचय करून दिला. महिला हक्क संरक्षण समितीच्या अध्यक्ष हेमा पटवर्धन, विलास सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित होते. विराज देवांग यांनी सूत्रसंचालन केले. हिरा पोळ यांनी आभार मानले.