शहरातील बॅरिकेडिंग उचलणार कधी?
By Admin | Updated: September 23, 2015 00:12 IST2015-09-23T00:12:20+5:302015-09-23T00:12:39+5:30
फास कायम : चोरट्यांसह भंगारवाल्यांची वक्रदृष्टी

शहरातील बॅरिकेडिंग उचलणार कधी?
नाशिक : सिंहस्थातील गर्दीवरील नियंत्रणासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स तिसऱ्या पर्वणीनंतरही कायम असून यामुळे नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो आहे़ या बॅरिकेड्सवर चोरटे तसेच भंगारवाल्यांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता असून अनावश्यक ठिकाणी पडून असलेले बॅरिकेड्स त्वरित हलवून ते पोलीस मुख्यालयातील मोकळ्या जागी ठेवणे गरजेचे आहे़
सिंहस्थातील पर्वणी काळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी मुव्हेबल दोन हजार तर मोझे चार हजार असे एकूण सहा हजार बॅरेकेडस् शहरात दाखल झाले होते़
भाविकांना अडवून ठेवणे, टप्प्याटप्प्याने सोडणे यासाठी बॅरिकेडिंगचा पोलिसांना चांगला फायदा झाला़ तसेच सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही़ नाशकातील तिन्ही पर्वण्या संपल्या असून काही ठरावीक व महत्त्वाची ठिकाणे सोडून हे बॅरिकेडिंग उचलणे गरजेचे आहे़
औरंगाबाद रोड, तपोवन, कन्नमवार पूल, अमरधाम, गौरी पटांगण, शाही मार्ग अशा बहुतेक ठिकाणी हे बॅरिकेड्स अस्ताव्यस्तपणे तसेच वाहतुकीस अडथळा ठरतील अशा पद्धतीने उभे आहेत़ काही ठिकाणी रचून ठेवलेले तर गोदापात्रात वाहून आलेले बॅरिकेड्सही तसेच आहेत़ यावर गर्दुल्ले, चोरटे तसेच भंगारवाल्यांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता असून हे बॅरिकेड्स त्वरेने उचलण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे़ (प्रतिनिधी)