नायगाव येथे आठवडे बाजाराला सुरुवात
By Admin | Updated: September 26, 2016 23:20 IST2016-09-26T23:19:15+5:302016-09-26T23:20:23+5:30
उत्साह : ४० वर्षांनंतर ग्रामस्थांनी केली खरेदीसाठी गर्दी

नायगाव येथे आठवडे बाजाराला सुरुवात
दत्ता दिघोळे ल्ल नायगाव
बटाटे वीस रुपये.. मिरची दहा रुपये.. भेंडी पंधरा रुपये.. कोणताही माल दहा रुपये.. आलेल्या दुकानदारांचे स्वागत.. ग्राहकांचे अभिनंदन.. या आणि अशा अनेक सुरांच्या आवाजाने उजाडला नायगावकरांचा शनिवार. निमित्त होते तब्बल ४० वर्षांनंतर सुरू झालेल्या आठवडे बाजाराच्या शुभारंभाचे !
गेल्या महिनाभरापासून नायगाव व परिसरातील ग्रामस्थांना आठवडे बाजार सुरू होणाऱ्या शनिवारची उत्सुकता होती. ग्रामपंचायत प्रशासनाला दुकानांची गर्दी व ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल काय याची उत्सकता होती. शनिवारी आठवडे बाजार भरला आणि विविध भागातून आलेल्या दुकानदारांनी व गाव परिसरातील ग्राहकांनी या आठवडे बाजाराला दिलेला प्रतिसाद पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून लागला. सकाळी ७ वाजेपासूनच बसस्थानक परिसरात एक एक करत अवघ्या तास-दीड तासात संपूर्ण परिसर विविध भाजीपाला, खाऊ, स्टोव्ह दुरुस्ती, कृषिपंप-गॅस शेगडी दुरुस्ती, खारी टोस्ट अशा विविध दुकानांनी संपूर्ण परिसर ग्राहकांच्या प्रतिसादाने गर्दीने फुलून गेला
होता.
गेल्या अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर नायगाव आठवडे बाजाराने फुलून गेला होता. गाव व परिसरातील नागरिकांनी याठिकाणी खरेदीसाठी व आठवडे बाजार बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी येणाऱ्या दुकानदारांना जागेची व्यवस्था करून देताना दिसत होते. पहिल्याच बाजारास दुकानदार व ग्राहकांचा प्रतिसाद बघता हा बाजार येत्या काही दिवसांत चांगलाच फुलेल, असा अंदाज आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, बाळासाहेब केदार, दिलीप पवार, लक्ष्मण भास्कर, धनलक्ष्मीचे चिंधू डोमाडे, बाळू कापडी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, जाखोरी, सोनगिरी, जोगलटेंभी, निफाड तालुक्यातील पिंपळगाव, सावळी, तळवाडे, महाजनपूर आदि गावांच्या लोकांना नायगाव हे इतर आठवडे बाजारासाठी जवळचे ठिकाण असल्याने या आठवडे बाजाराला प्रत्येक शनिवारी चांगला प्रतिसाद लाभेल, असा अंदाज आहे. परिसरात नायगावच्या आठवडे बाजाराचीच चर्चा रंगली आहे.
स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून खरेदी
शुभारंभाचा बाजार असल्याने बाहेरून आलेल्या दुकानदारांची खरेदी-विक्री झाली पाहिजे या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांकडे विविध मालाची खरेदी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड हे ध्वनिक्षेपकावरून दुकानदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. नायगाव परिसर तसा शेतीवरच अवलंबून आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकत असला तरी बाजार सुरू राहण्यासाठी आज अनेक शेतकऱ्यांनी गरज नसतानाही भाजीपाला खरेदी केली, तर अनेकांनी खाऊच्या दुकानात भारतीय बैठक मारत गरमागरम जिलेबी व भेळ खाण्याचा आनंद लुटला.