ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:58 PM2019-04-07T22:58:09+5:302019-04-07T22:58:55+5:30
नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.
![Water supply to Mamdapur reserve | ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा Water supply to Mamdapur reserve | ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/07mamdapur-pani_201904218441.jpg)
ममदापूर राखीव क्षेत्रात पाणीपुरवठा
नाशिक : जिल्ह्यातील येवला तालुक्यात माणसांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत पडली असून, उन्हाची तीव्रता अन् पाण्याच्या दुर्भिक्षामुळे येथील मुक्या प्राण्यांच्या जिवाची काहिली होत आहे. वन्यजिवांच्या तृष्णेची जाणीव शहरातील ‘इको-एको फाउंडेशन’च्या स्वयंसेवकांना झाली आणि त्यांनी भूतदयेतून का होईना, या स्वयंसेवकांनी ममदापूर राखीव वनसंवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक पाणवठे भरण्यासाठी पुढचे पाऊल टाकले आहे.
कथित वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमींची संख्या कमी नाही. यामुळे जे खरेखुरे प्रामाणिकपणे ‘प्रेमी’चे कर्तव्य बजावतात, त्यांच्याकडेदेखील समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तसे होणे स्वाभाविकही आहे. मुक्या जिवांची तृष्णा भागावी जेणेकरून दुष्काळाचे ते बळी ठरू नयेत आणि वन्यजीवप्रेमी म्हणून आपले कर्तव्याची जाणीव ठेवून इको-एको फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी आपपसात वर्गणी गोळा करून ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील कोरडेठाक झालेले पाणवठे पाण्याने भरण्याचा उपक्रम हाती घेतला.
गुढीपाडव्याच्या दिवशी या स्वयंसेवकांनी ही आगळीवेगळी गुढी उभारून रविवारी (दि.७) संवर्धन क्षेत्र गाठले. या भागात पाण्याच्या टॅँकरची आगाऊ नोंदणी करून घेत स्वयंसेवकांनी पाणवटे भरण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात दोन पाणवटे उभारलेल्या निधीतून भरणे शक्य झाल्याचे अभिजित महाले यांनी सांगितले; मात्र समाजातील दानशुरांनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. मेअखेरपर्यंत या भागातील पाणवटे संस्थेने दत्तक घेतले असून, हा उपक्रम पहिल्या पावसापर्यंत सातत्याने राबविण्याचा मानस महाले यांनी व्यक्त केला.
अडीच हजारांचा एक टॅँकरयेवला तालुक्यात पाणी ‘महाग’ झाले आहे. पाणी मिळणे या भागात दुरापास्त झाल्यामुळे पाण्याचे टॅँकर ‘भाव’ खाऊन जात आहे. शासनाच्या टॅँकरचा मुबलक पुरवठा होत नसून खासगी टॅँकरची किंमत अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत आहे.
राखीव संवर्धन क्षेत्र सुमारे साडेचार हजार हेक्टरवर आहे. या भागात वनविभागाकडून दररोज केवळ दोन टॅँकरद्वारे पाणवठे भरले जातात; मात्र उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे टॅँकरची संख्या या क्षेत्रात वाढविण्याची मागणी होत आहे.