सभापतींच्याच प्रभागात पाणीटंचाई
By Admin | Updated: June 4, 2014 01:56 IST2014-06-04T01:56:16+5:302014-06-04T01:56:49+5:30
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मनपा प्रभाग क्रमांक ५ मधील स्नेहनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

सभापतींच्याच प्रभागात पाणीटंचाई
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मनपा प्रभाग क्रमांक ५ मधील स्नेहनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, या प्रभागाचे नेतृत्व पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती शालिनी पवार या करीत आहेत आणि त्यांच्याच प्रभागात पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. विस्ताराने मोठ्या असलेल्या या प्रभागात दाट नागरी वसाहत असून, नागरिकांना सध्या पुरेसे पाणी मिळत नाही. नळाला पाणी येत असले तरी अपुर्या दाबाने व अत्यल्प वेळ पाणी राहत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच कधी-कधी मध्यरात्रीच्या सुमारास नळाला पाणी येते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाणी भरावे लागत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे. मध्यरात्री उठूनही पुरेसे पाणी मिळत नसून अवघ्या १५ ते २० मिनिटांत पाणीपुरवठा खंडित होत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. पाणीपुरवठा नियमित व पुरेशा दाबाने व्हावा व वेळेत बदल करावा, अशीही नागरिकांची मागणी आहे. प्रभागाच्या लोकप्रतिनिधी तसेच पंचवटी पाणीपुरवठा विभागाने तत्काळ लक्ष केंद्रित करून स्नेहनगर भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)