नाशिक विभागात पाणीटंचाईचे संकट
By Admin | Updated: September 1, 2015 23:22 IST2015-09-01T23:20:36+5:302015-09-01T23:22:22+5:30
सप्टेंबरमध्ये आशा : तीन महिन्यात ४० टक्के कमी पर्जन्यमान

नाशिक विभागात पाणीटंचाईचे संकट
नाशिकरोड : यंदाच्या वर्षी गेल्या तीन महिन्यांत पर्जन्यराजाने पाठ फिरविल्याने म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. गेल्या तीन महिन्यांत नाशिक विभागात ३५-४० टक्के पाऊस कमी पडलेला आहे. या सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाचे आगमन न झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
पावसाळा ऋतु प्रारंभापासून १ जून ते ३१ आॅगस्टपर्यंत तीन महिन्यात नाशिक विभागात ८४.२ मिलीमीटर टक्के पाऊस अपेक्षित असतांना प्रत्यक्षात मात्र ६१.५ मिलीमीटर टक्के पाऊस पडलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यात ८२८ मि.मी. अपेक्षित पाऊस असतांना ४५६ मि.मी. पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात अपेक्षित ४२५ मि.मी. अपेक्षित पैकी २९६ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ६८४ मि.मी. पैकी४८०.७ मि.मी., जळगाव जिल्हा ५९३ मि.मी. पैकी २९५.६ मि.मी., अहमदनगर जिल्ह्यात २९८ मि.मी. पैकी १७४.२ मि.मी. पाऊस पडला आहे. नाशिक विभागात एकूण ५५४ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असतांना ३४०.५ मि.मी. इतकाच पाऊस पडला आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत गेल्या ३ महिन्यांत नाशिक जिल्ह्यात ८२.२ टक्केवारी पाऊस अपेक्षित असतांना ५५.१ टक्के पाऊस पडला आहे. धुळे जिल्ह्यात ९८.५ टक्के अपेक्षित असतांना ६९.७ टक्के, नंदुरबार जिल्हा ६८.२ टक्के अपेक्षित ७०.३ टक्के, जळगाव जिल्हा ८२ टक्के मात्र ५५.४ टक्के, अहमदनगर १०९.९ टक्के मात्र ५८.४ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. विभागामध्ये एकूण ८४.८ टक्के पाऊस अपेक्षित असतांना ६१.५ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे चालु सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसावर सर्व काही अवलंबुन आहे. या महिन्यात पाऊस न झाल्यास पाणी टंचाईला सामोरे जाण्याची परिस्थिती येणार आहे. (प्रतिनिधी)