पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर

By Admin | Updated: June 29, 2014 00:36 IST2014-06-28T22:06:19+5:302014-06-29T00:36:15+5:30

पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Water, Fever Questioner Critical | पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पाणी, चाऱ्याचा प्रश्न गंभीर


नाशिक : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. खरिपाचे संपूर्ण नियोजन कोलमडल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून, दुष्काळाची छाया जाणवू लागली आहे.

खामखेडा : पावसाने दांडी मारली. मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी पाऊस झाला नसल्याने पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दरवर्षी साधारणत: मे महिन्याच्या २४ ते २५ तारखेपासून रोहिणी नक्षत्राने पाऊस सुरू होतो. मृग नक्षत्रात पाऊस झाला की शेतकरी पिकांची पेरणी करतो आणि जून महिन्यामध्ये पाऊस झाल्यानंतर जनावरांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये चारा तयार होतो. यावर्षी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मृगाने पाठ फिरवली. शेतातील विहिरींनीही तळ गाठला आहे. जनावरांचा चारा संपला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पशुधन कसे जतन करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता तरी शेतकरी जनावरांसाठी चारा शोधत आहेत. मार्च महिन्यामध्ये झालेल्या बेमोसमी पाऊस व गारांमुळे उघड्यावर असलेला चारा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. शेतकरी जनावरांसाठी खोडं टाकत असून, त्याचाही भाव सोन्याप्रमाणे आहे. एका आरीचे भाव एक हजार ते पंधराशे रुपये आहे.
साधारणत: या आरीमध्ये एक बैलगाडी साधारणपणे भरते.
आता मुलांचे शिक्षण करावे की, जनावरांसाठी चारा यासाठी पैसा कोठून उपलब्ध करावा याचा विचार शेतकरी करतो आहे.
रेडगाव खुर्द : चांदवड तालुक्यात खरिपाला पूरक असलेल्या रोहिणी, मृग नक्षत्रात पावसाचा थेंबही पडला नाही. आर्द्रा नक्षत्राचे पाचही दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या लांबल्या असून, नियोजनाबरोबर शेतकरी कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
गतवर्षी मान्सूनपूर्व पावसासह रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने मशागत व पेरणीयोग्य हजेरी लावल्याने किमान खरिपाच्या पेरण्यांबाबत समाधान होते. नंतर पावसाची दीर्घ सुट्टी, असमानता यामुळे उत्पादनात घट आली. कमी पावसामुळे नदीनाले कोरडेठाक राहिले. विहिरी, इंधन विहिरींनी अल्पावधीतच ‘राम’ म्हटले. परिणामी रब्बीला रामराम म्हणावे लागले. वाढीव निर्यात शुल्काआडूनच्या निर्यातबंदीने कांदा उत्पादकांचे कंबरडे मोडले. सिंचनाच्या मदतीने पाणीटंचाईवर मात करून जगवलेल्या थोड्याबहुत पिकावर बेमोसमी पाऊस व गारपिटीने वरवंटा फिरवला. शासन मदतीचे अद्याप शंभर टक्के वाटप नाही. या विपरीत परिस्थितीतही शेतकऱ्यांनी अच्छे दिन येतील म्हणून हिरवे स्वप्न पेरण्यासाठी कंबर कसली मात्र हिवाळा-उन्हाळाभर ठाण मांडून असलेल्या पावसाच्या वातवरणाने खरिपाचे वेध लागताच गाशा गुंडाळला आहे. परिणामी मशागतीला पूरक असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने अद्याप शेतातील ढेकूळ फुटलेला नाही. खरिपाला पूरक असलेल्या रोहिणी व मृग नक्षत्रात कुठे पावसाचा थेंब पडला नाही. मोराचे वाहन घेऊन आर्द्रा नक्षत्राचे पाच दिवस कोरडेठाक गेले आहे. दरम्यान, तालुक्यात अल्पशा पाण्यावर केलेली टमाटा लागवड वाया गेली आहे. अनेकांना रोप बांधावर टाकून द्यावे लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील रोपही वाया जाण्याची भीती आहे.

पाऊस लांबल्याने खरीपाचे नियोजन कोलमडले असून ईिश्चत पिकाच्या पेरणीला फाटा द्यावा लागणार आहे.आधीच पावसाची अनिश्चितता त्यात लांबलेला खरीप यामुळे गत तीन-चार वर्षाप्रमाणे यंदाही रब्बीचे स्वप्न धूसर होण्याची चिन्हे आहे.बळीराजा चातकाप्रमाणे वरु णराजा बरसण्याची वाट पाहत आहे.(वार्ताहर)
 दुष्काळ, अवर्षण हे चांदवड तालुक्याच्या पाचवीलाच पुजलेले असून, राज्यात दुष्काळी तालुका म्हणून अव्वलस्थानी नाव आहे. आधीच पावसाची कमी त्यात इच्छाशक्तीअभावी येथील कथित भाग्यविधात्यांचे पाटपाण्याचे गाजर भरवशाच्या बैलाप्रमाणे ठरल्याने तालुक्यातील शेती व्यवसाय निसर्गाधिन राहून नेहमीच पावसाच्या लहरीपणावर हिंदोळे घेत आला आहे. वर्षागणिक पावसाचा लहरीपणा वाढत असल्याचा अनुभव येत आहे. गेल्या चार-पाच वर्षात पावसाचे प्रमाण विषम स्वरूपाचे झाले असून, एकाच गावच्या शिवारात पावसाची समानता नाही. कधी पेरणीला ओढ, कधी पिकाच्या बाल्यावस्थेत तर कधी ऐन बहरात पाऊस ओढ देत असल्याने खरिपाच्या उत्पादनात घट नायगाव : जून महिन्याचे जेमतेम दोन दिवस बाकी आहेत. रोहिणी व मृग दोन्हीही नक्षत्रं कोरडी गेली. त्यापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रातही पावसाने डोळे वटारल्याने नायगाव खोऱ्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या आहेत. लागवडीसाठी भाजीपाला-वर्गीय पिकांची रोपे तयार असतानाही पाण्याअभावी त्यांची लागवड करता येत नाही. सध्या पाण्याअभावी नगदी पिकेही नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
परिसरात सलग तीन वर्षांपासून पाऊस नसून चौथ्या वर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कूपनलिका, विहिरी व बंधारे आदि सर्वच जलस्रोत ठणठणीत कोरडे पडल्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही खालावली आहे. यंदा रोहिणी नक्षत्राचा एक अवकाळी पाऊसवगळता परिसरात टिपूसही पडला नसल्याने खरीप हंगामात लागवडीसाठी तयार केलेली विविध भाजीपालावर्गीय पिकांची रोपे लागवडीसाठी तयार झाली आहेत. मात्र पाणीटंचाई व कडक उन्हामुळे ती कोमेजू लागली आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे कोणतीही पिके नसल्याने शेतकऱ्यांच्या हाती पैसा येत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरीप हंगामाच्या तयारीसाठीही हाती पैसा नसतानाही अनेक शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज, सोनेतारण व हातउसने पैसे घेऊन बी-बियाणे, खते व मशागती केल्या आहेत. मात्र पाऊस झाला नसल्याने घेतलेली बियाणे पडून राहण्याची वेळ आली आहे. खरिपाच्या पेरण्यांची वेळ निघून जाण्याची वेळ आल्याने उशिराच्या पेरण्यांमधून उत्पादनावर परिणाम होणार असून, पुढील रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडण्याची शक्यता असल्याने कोणताही शेतकरी उपलब्ध पाण्यावर पिकांची लागवड करण्याचे धाडस करीत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी होते त्या शेतकऱ्यांनी मिरची, टमाटे, वालवड आदि पिकांची लागवड केली होती; मात्र मध्यंतरीच्या जोरदार वाऱ्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (वार्ताहर)

Web Title: Water, Fever Questioner Critical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.