खर्डा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न
By Admin | Updated: June 5, 2014 01:56 IST2014-06-05T01:54:08+5:302014-06-05T01:56:12+5:30
खर्डा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न

खर्डा परिसरात पाण्याचा गंभीर प्रश्न
देवळा : तालुक्यातील खर्डा व परिसरातील शेती व्यवसाय गत चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे मोडीत निघाला आहे. या भागातील पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी पाण्यासाठी इतर पर्याय शोधत आहेत. चणकापूर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्या व खर्डा गावाला लागून असलेल्या वाजगाव येथे विहिरीसाठी जागा घेण्यासाठी खर्डा गावातील शेतकर्यांमध्ये चढाओढ सुरू झाली असून, अव्वाच्या सव्वा किंमत देऊन विहिरीसाठी जागा खरेदी केली जात आहे. यामुळे वाजगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन विहिरींचे खोदकाम सुरू आहे. वाजगाव येथील ग्रामस्थांनी गावातील पाणी बाहेरगावी जाऊ द्यावयाचे नाही, असा ठराव ग्रामसभेत काही वर्षांपूर्वी केला होता. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी बाहेरगावी जाणारे सर्व पाणी बंद केले होते. यासाठी सर्व गावाने एकजूट दाखविली होती. दरम्यान संबंधित देवळा व खर्डा येथील काही विहीरमालक न्यायालयात गेले होते. त्यावेळी न्यायालयाने शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाजगाव येथे बाहेरगावच्या विहिरी न्यायालयात अंतिम निकाल लागेपर्यंत सुरू करून त्या शेतकर्यांना दिलासा दिला होता. यानंतर या बंद असलेल्या विहिरी पूर्ववत सुरू झाल्या. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे गावातील ग्रामस्थांनी विरोध केला नाही. यामुळे वाजगाव येथील पाणी पाइपलाइनद्वारे देवळा व खर्डा येथे जाऊ लागले. बाहेरगावी पाणी जाऊ देण्याबाबत वाजगाव येथील निर्बंध हटल्याने खर्डा येथील शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या. हे शेतकरी वाजगाव येथील कालव्या लगतच्या परिसरात असलेल्या शेतकर्यांकडे विहिरीसाठी जागा शोधू लागले. यामुळे येथे जमिनीचे भाव एकदम कडाडले.