वाळूजला भीषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2016 00:54 IST2016-06-28T00:38:43+5:302016-06-28T00:54:15+5:30
वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

वाळूजला भीषण पाणीटंचाई
वाळूज महानगर : वाळूज गावातील नवीन वसाहतीमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायत कर्मचारी कुणालाही जुमानत नसल्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाणीपुरवठ्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदारास सरपंच टँकरचे पोकळ आश्वासन देऊन बोळवण करीत असल्यामुळे नागरिकांत नाराजी आहे.
वाळूज गावात चार महिन्यांपासून पाणीटंचाई आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नसल्यामुळे महिला व नागरिकांना नळाला पाणी येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. सद्यस्थितीत शिवाजीनगर, दत्त कॉलनी, श्रद्धा कॉलनी, श्रीराम कॉलनी इ. वसाहतींमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही नागरिकांची दिशाभूल करून वीजपुरवठा बंद होता, पाईपलाईन फुटली इ. कारणे दिली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णपणे कोलमडले असून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यही फारसे स्वारस्य दाखवीत नाहीत. सध्या गावात पाच टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ग्रामपंचायतीच्या वतीने जवळपास ५ लाख रुपये खर्च करून विहीर दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. पुरेसे पाणी असतानाही केवळ कर्मचाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
या विषयी ग्रामविकास अधिकारी एस.सी.लव्हाळे म्हणाले की, गावातील अनेक भागांत पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणारे कर्मचारी कामचुकारपणा करीत असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आदेशही पाळत नसल्यामुळे या दोषी कर्मचाऱ्यांना तंबी देण्यात आली आहे. पाणीपुरवठ्या संदर्भात तक्रारी आल्यास संबधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.