नांदूरवैद्यच्या महिलांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 00:49 IST2021-05-04T23:49:41+5:302021-05-05T00:49:18+5:30
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने, परिसरातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव आदीं गावांसह गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

नांदूरवैद्य येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी.
नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यात गेल्या चार दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने, परिसरातील नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुऱ्हे, गोंदे दुमाला, कुऱ्हेगाव आदीं गावांसह गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतींचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी, चार दिवसांपासून गावात होणारा मुख्य पाणीपुरवठा बंद झाल्याने महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, तसेच परिसरातील गावांचा वीजपुरवठा अवकाळी पावसामुळे खंडित झाल्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठा करणाऱ्या रोहित्रात बिघाड होऊन ते बंद पडले. वाडीवऱ्हे वीज वितरणचे कर्मचारी गेल्या चार दिवसांपासून रात्रंदिवस या कामात व्यस्त असून, काम प्रगतिपथावर सुरू असल्याचे वीज वितरणचे अधिकारी धवल आगरकर यांनी सांगितले. पाणीपुरवठा करण्यासाठी वीजच उपलब्ध नसल्यामुळे येथील महिलांना भर उन्हात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. आता जरी अवकाळी पावसामुळे वीजतारा, विजेचे खांब पडले असले, तरी वाडिव-हे वीज उपकेंद्राचा नेहमीच खेळखंडोबा सुरूच असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. वाडिव-हे ३३ के.व्ही. उपकेंद्रासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर करून नेहमीच बिघाड होत असलेल्या ठिकाणी नवीन उपकरणे, रोहित्र, तसेच जीर्ण झालेले विजेचे खांब तत्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, तसेच ग्रामस्थ करीत आहेत.