वाहकाकडून माणुसकीचे दर्शन : विवाह मुहूर्तावरील धावपळ थांबली हरविलेली सनई अन् हलगी मिळाली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:58 IST2018-05-08T23:58:21+5:302018-05-08T23:58:21+5:30
पेठ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद जोपासणाऱ्या एसटी महामंडळात सेवा बजावणाºया कर्मचाºयाकडून माणुसकीचेही दर्शन घडले.

वाहकाकडून माणुसकीचे दर्शन : विवाह मुहूर्तावरील धावपळ थांबली हरविलेली सनई अन् हलगी मिळाली परत
पेठ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद जोपासणाऱ्या एसटी महामंडळात सेवा बजावणाºया कर्मचाºयाकडून माणुसकीचेही दर्शन घडले. आड बुद्रुक येथील सनईवादक पांडुरंग ठाकरे व त्यांचा पाच जणांचा गु्रप यांना निगडोळ येथील एका लग्नात सनईवादनासाठी जायचे होते. ते सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास करंजाळी स्टॅण्डवरून पेठकडून येणाºया वापी-नाशिक बसमध्ये बसले व उमराळे येथे उतरले. सध्या लग्नाचा हंगाम असल्याने त्यांना अनेक ठिकाणी मागणी आहे. कामाच्या व्यापामुळे व जागरणामुळे उमराळे येथे उतरताना सनई व हलगीची पिशवी त्यांच्याकडून बसमध्येच राहून गेली. रात्री १० वाजेच्या सुमारास निगडोळ गावी पोहोचल्यावर साहित्याची पिशवी बसमध्ये राहून गेल्याचे लक्षात आहे. सकाळी लग्नमंडपात सनईवादन कसे करावे व वधू-वरांच्या मंडळींना कसे सांगावे, या विचारात त्यांची झोप उडाली. त्याच बसमधून एक अनोळखी गृहस्थ प्रवास करत होते. त्यांच्या सीटजवळ ही पिशवी आढळून आली. व ते गृहस्थ नाशिक येथे पिशवी न घेता रिकाम्या हाती उतरले. ही बाब वाहकाच्या लक्षात आली. वाहक व गृहस्थ हे दोघेही एकमेकांना परिचित होते. त्या गृहस्थाचा भ्रमणध्वनी क्रमांक वाहकाजवळ होता. लागलीच त्याने फोन केला व पिशवी आणि त्या पिशवीतील साहित्यांचे वर्णन केले. ती माझी पिशवी नसून वाजंत्री म्हणून काम करणारे आड येथील ठाकरे यांची असल्याचे त्या गृहस्थाने वाहकाला सांगितले. कारण तो गृहस्थ ठाकरेबाबा यांना ओळखत होता. त्याने वाहकाला फोन करून सदरची पिशवी सकाळी नाशिकवरून वापीकडे जाताना करंजाळी येथे एका भाजीपाल्याच्या टपरीजवळ ठेवण्यास सांगितले. वाहकाने ती पिशवी दुकानदाराकडे देत आड येथील ठाकरेबाबांची आहे. ती त्यांना परत करा. असे सांगून बस वापीकडे मार्गस्थ झाली. भाजीच्या दुकानदाराने पिशवी मिळताच ठाकरेबाबांना फोन केला. तुमची साहित्यांची पिशवी हरविली आहे का? समोरून उत्तर आले. होय, ती पिशवी माझ्याकडे असल्याचे दुकानदाराने सांगितले. ठाकरेबाबांनी लागलीच धाव घेत यांच्या ताफ्यातील पाचही जण पिशवी ठीक असल्याने हरखून गेले.