वीरपत्नी यशोदा यांची उत्तुंग भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 01:54 IST2020-07-20T20:54:34+5:302020-07-21T01:54:09+5:30

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

Veerapatni Yashoda's greatness | वीरपत्नी यशोदा यांची उत्तुंग भरारी

वीरपत्नी यशोदा यांची उत्तुंग भरारी

नाशिक : सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी येथील वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांनी आपल्या हुतात्मा पतीचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. पदवीधर होऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये भारत-पाक सीमेवर झालेल्या गोळीबारात भारतीय सेनेचे नायक केशव गोसावी २०१८ साली नोव्हेंबर महिन्यात हुतात्मा झाले. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच यशोदा यांना कन्यारत्न प्राप्त झाले. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून त्यांनी स्वत:ला सावरत आपल्या तान्हुल्या ‘काव्या’चा सांभाळ करण्यावर लक्ष केंद्रित केले. मुलगी लहान असल्यामुळे त्यांना त्यावेळी शिक्षणाकडे वळता आले नाही; मात्र मागील वर्षी त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आपल्या माहेरी बारावीला ‘एक्स्टर्नल’ म्हणून प्रवेश घेतला.
घरी सासरे एकटेच असल्याने व काव्या लहान असल्यामुळे नियमतिपणे महाविद्यालयात जाणे शक्य नसल्याचे त्यांनी तेथील प्राचार्यांना पटवून दिले. आई, वडील, सासरे व शिक्षक वर्गाची त्यांना चांगली साथ व पाठिंबा लाभला. यामुळेच बारावीची परीक्षा ७५ टक्के गुणांनी उत्तीर्ण करता आली, असे यशोदा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
------------
केवळ रात्रीचे दोन तास अभ्यास
वीरपत्नी यशोदा यांनी बारावीला कला शाखेतून प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते; मात्र त्यांची भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची जिद्द व हुतात्मा केशव यांचे स्वप्न पूर्ण करण्याची बांधलेली खुणगाठ यामुळे केवळ दररोज रात्री ८ ते १० असा दोन तास घरी अभ्यास करून त्यांनी ७५ टक्के गुण मिळविले. आता पुढील शिक्षणासाठी यशोदा गोसावी यांनी जिद्दीने अभ्यास करण्याचे ठरविले असून, आपल्या मुलीलाही चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि संस्कार देऊन मोठे करण्याचे ठरविले आहे.
------------
आयटीआयचा पदविका अभ्यासक्र म लग्नानंतरच पूर्ण केला; मात्र कालांतराने शिक्षण मागे पडले. पती शहीद झाल्यानंतर मीसुद्धा भारतीय सेनेत भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे पदवीचा मार्ग मोकळा करणे गरजेचे होते. म्हणून दोन तास मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आणि परीक्षा उत्तीर्ण केली.
- यशोदा केशव गोसावी, वीरपत्नी

Web Title: Veerapatni Yashoda's greatness

टॅग्स :Nashikनाशिक