अनधिकृत साहसी पर्यटनाच्या आयोजनाला दणका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:19 IST2021-08-28T04:19:42+5:302021-08-28T04:19:42+5:30
नाशिक : राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्याच्या साहसी पर्यटन उपक्रम धाेरणास मान्यता देण्यात आली आहे. ...

अनधिकृत साहसी पर्यटनाच्या आयोजनाला दणका !
नाशिक : राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्याच्या साहसी पर्यटन उपक्रम धाेरणास मान्यता देण्यात आली आहे. या नवीन धोरणानुसार साहसी पर्यटनासाठी करण्यात आलेली नियमावली सर्व संबंधित संस्था, व्यक्ती आणि व्यक्तीसमूहाला आणि आयोजकांना लागू करण्यात आल्या आहेत. अधिकृतपणे साहसी पर्यटनाचे आयोजन करूनही अपघात झाल्यास संबंधिताविरुद्ध चौकशीअंती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच अनधिकृत साहसी पर्यटन आयोजन केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास थेट पोलिसी कारवाई होणार असल्याचा इशाराच या नवीन धोरणाव्दारे देण्यात आला आहे.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणात साहसी पर्यटनासाठी अनेक बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. त्यात साहसी पर्यटन हे एखाद्या धार्मिक, राजकीय, सामाजिक किंवा अन्य वाद असल्यास त्यासाठी पोलिसांचे ना हरकत तर सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने साहसी पर्यटन उपक्रमासाठी संबंधित विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच साहसी पर्यटनात १८ वर्ष आतील बालकांचा समावेश असल्यास त्यांच्या पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र, लेखी परवानगी आवश्यक करण्यात आली आहे. त्या साहसी पर्यटनातील धोक्याची, त्रासाची माहिती संबंधित पर्यटकास टेक्स्ट मेसेजव्दारे, ऑनलाइन माहिती देणे आयोजकासाठी बंधनकारक आहे. तसेच संबंधित आयोजकांनी साहसी पर्यटन उपक्रमाच्या स्थानावर मार्गदर्शक नेमण्यासह फिरते पथक नेमणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय विशिष्ट निश्चितस्थळी साहसी पर्यटन करणाऱ्या आयोजकांनी दिशादर्शक नकाशे, सूचनाफलक, टेहळणी मनोरे, बचावासाठीच्या सुरक्षा उपाययोजना करणे आवश्यक असून अपूर्ण, अर्धवट, कमी दर्जाच्या सुरक्षा उपाययोजना, साहित्य आढळल्यास संबंधित आयोजकावर कारवाई करण्यात येईल.
इन्फो
थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
साहसी पर्यटन उपक्रम राबविताना अपघात झाल्यास उपक्रमाच्या आयोजकाला पूर्णपणे जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचे पालन न करता साहसी पर्यटन केल्यानंतर कुणाच्या जिवाला धोका झाल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हादेखील दाखल करण्यात येणार आहे.