चेंबरमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू
By Admin | Updated: September 5, 2015 22:46 IST2015-09-05T22:46:10+5:302015-09-05T22:46:49+5:30
चेंबरमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू

चेंबरमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू
नाशिक : सातपूरमधील एका कारखान्यात तुंबलेली गटार मोकळी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या एका कामगारासह दोन जणांचा चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एका कर्मचाऱ्याला चेंबरमधून बाहेर काढण्यात अग्निशमक दलाला यश आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. विनोद मारू आणि दीपक रामचंद्र माळी अशी या दोघा मृत कामगारांची नावे असून, त्यापैकी माळी हा पालिकेचा कर्मचारी नव्हता. अवघ्या दहा महिन्यांतच अशी दुसरी दुर्घटना घडल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, संतप्त कर्मचारी आणि आप्तेष्टांनी या दोघा कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर अखेरीस मृतदेह ताब्यात घेण्यात आले.
या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले असून, त्याचबरोबर मृत कामगारांच्या वारस पत्नींना पालिकेच्या सेवेत रोजंदारीवर घेण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनास दिले आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीत नाईस एरियामध्ये सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या भागातील सी १२ रोडवर श्री साईश इंजिनिअरिंग कंपनी असून, तिचे गटार तुंबल्याने कंपनीचे मालक प्रमोद वैद्य यांनी पालिकेला रीतसर कळविले आणि आवश्यक ती रक्कम भरली होती. त्यानुसार पालिकेचे कर्मचारी सकाळी अकरा वाजता पालिकेचे व्हॅक्यूम एम्टीयर वाहन घेऊन तेथे गेले.
यावेळी विनोद मारू आणि त्याचा मित्र असलेला खासगी कामगार दीपक माळी तसेच संतोष जाधव हे तिघे वाहनासमवेत गेले. मारू आणि माळी यांनी चेंबरचा ढापा काढून व्हॅक्यूम एम्प्टीयरच्या सहाय्याने तुंबलेले पाणी काढून घेतले. मात्र, पाइप गाळातच अडकला. चेंबरमध्ये वाकून तो पाइप ओढत असतानाच विनोद मारूचा तोल गेला आणि तो चेंबरच्या पंधरा फूट खोल टाकीत पडला. त्यामुळे दीपक माळी त्याला वाचवण्यासाठी चेंबरमध्ये उतरला; परंतु तोही खोलवर आत गेल्याने पालिकेचा कर्मचारी संतोष जाधव हा चेंबरमध्ये उतरला आणि तोही चेंबरमध्येच अडकला. सदरचा प्रकार बघताच भयभीत झालेले वाहनचालक प्रकाश मोहिते यांनी अग्निशमन दलाला दूरध्वनी केला. काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी टाकीत उतरून दोराच्या सहाय्याने तिघांनाही बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु मारू आणि माळी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. संतोष जाधव मात्र बचावला; परंतु त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.