पतंग पकडतांना विहिरीत पडून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 14:46 IST2020-01-15T14:44:45+5:302020-01-15T14:46:03+5:30
सिन्नर : पंतग उडवत अ्रसतांना कटलेली पतंग पकडतांना विहिरीत पाय घसरुन बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहराजवळील मापारवाडी रस्त्यालगत घडली.

- सिन्नर येथे पतंग पकडतांना बारा वर्षीय मुलगा विहिरीत पडल्यानंतर शोधकार्य राबवितांना युवक व घटनास्थळी झालेली गर्दी.
आर्यन विलास नवाळे (१२) रा. संत हरीबाबा नगर, सिन्नर हा सहावी इयत्तेत शिकणारा मुलगा त्याच्या मित्रांसोबत शेतात पतंग उडवत होता. यावेळी कटलेली पतंग पकडत असतांना तो धनंजय जाधव यांच्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडला. विहिर पाण्याने तुटंब भरलेली होती. मित्रांनी आर्यन विहिरीत पडल्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. सामाजिक कार्यकर्ते विजय बोºहाडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी सिन्नर पोलीस व नगरपरिषद अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.
विहिरीत भरपूर पाणी असल्याने त्यात गळ टाकून शोधकार्य राबविण्यात आले. विलास गांगुर्डे, सागर गवळी, मनोज शिंदे यांच्यासह अग्निशामक दलाचे लाला वाल्मिक, नारायण मुंडे, जयेश बोरस्ते, हरिष पाटील यांनी विहिरीत शोधकार्य केले. त्यानंतर आर्यनचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पतंग उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करत असतांना बालकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याने घटनेवर सिन्नरनगरात शोककळा पसरली.