महापौरपदाची शंभरी, अजुनी नाही तरतरी
By Admin | Updated: December 26, 2014 00:08 IST2014-12-26T00:08:23+5:302014-12-26T00:08:35+5:30
अडथळ्यांची शर्यत सुरूच : मनसेचे इंजिन धावतेय धिम्या गतीने

महापौरपदाची शंभरी, अजुनी नाही तरतरी
नाशिक : पाच दिवसांपूर्वी २० डिसेंबरला मनसेचे अशोक मुर्तडक (राज ठाकरे यांच्या भाषेत ‘चायना वॉल’) यांच्या महापौरपदाला शंभर दिवस पूर्ण झाले. पदभार स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांच्या स्वप्नातील नाशिकची संकल्पना मूर्त स्वरूपात उतरविण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या महापौरांचा शंभर दिवसांचा प्रवास पाहिला, तर महापौरांची अजूनही अडथळ्यांची शर्यत सुरूच असून, कार्यपद्धतीत अपेक्षित अशी तरतरी नसल्याने मनसेचे इंजिन धिम्या गतीनेच धावते आहे.
नाशिकचे चौदावे महापौर म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांनी दि. १२ सप्टेंबर रोजी निवड झाली. मुर्तडक यांच्या रूपाने आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेने महापालिकेतील सत्ता कायम राखली. मुर्तडक यांची महापौरपदी निवड झाली आणि त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापौरांना अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा धडाका सुरू करता आला नाही. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आटोपल्यानंतर २० आॅक्टोबरला आचारसंहिता शिथिल झाली आणि त्यानंतर झालेली महासभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आचारसंहिता संपल्यानंतर आता कामाला सुरुवात करावी, अशी वेळ येऊन ठेपली असताना पक्षांतर्गत आव्हाने समोर ठाकली गेली. माजी आमदार वसंत गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक आणि जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारत अस्वस्थता निर्माण केली. त्यामुळे पालिकेतील मनसेच्या नगरसेवकांमध्येही अप्रत्यक्षपणे गटतट निर्माण झाले. राज ठाकरे यांनी राजीनामास्त्र देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवून त्यातील हवा काढून घेतली; परंतु महापौरांसमोरील अडचणी काही कमी झाल्या नाहीत. महापौरांनी पदभार स्वीकारला त्याचवेळी पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नव्हता. १३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर या कालावधीपर्यंत आयुक्त नसल्याने महापालिकेचेही कामकाज थंडावले होते. महापौरांच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात महापालिकेला तर सुमारे दोन महिने तर पूर्णवेळ आयुक्तच नव्हते. १० नोव्हेंबरला डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यांनीही अभ्यासात गुंतवून घेतल्याने नगरसेवकांची कामे रखडली. परिणामी, महापौरांना आता नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापौरांनी डेंग्यूने थैमान घातले तेव्हा शहरात स्वच्छता मोहीम राबविली, त्यानंतर शहरातील उद्यानांना भेटी देत पाहणी केली आता प्रभागांचे दौरे सुरू केले आहेत. शंभर दिवस उलटूनही महापौरांना पाहिजे तशी पकड घेता आलेली नाही. (प्रतिनिधी)